मुंबई । प्रतिनिधी Mumbai
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू आणि काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क साधून अजित पवार यांनी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद आणि सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.