नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून (Central Government) कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) बातमी समजल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून आज (बुधवारी) सकाळी दिल्लीत (Delhi) परतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याशी चर्चा केली. यानंतर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापले सैन्य तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: भारतीय वायूदल आणि नौदलाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते का, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे पहलगाम येथे ज्याठिकाणी हल्ला झाला त्या बैसरन व्हॅलीत हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर अमित शाह यांनी हल्ला झालेल्या ठिकाणाची फिरुन पाहणी केली. यावेळी शाह याठिकाणी हल्ला कसा झाला, याची सगळी माहिती घेऊन त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत.
दरम्यान, दिल्लीत गेल्या काही तासांपासून महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौधरी यांची एक उच्चस्तरीय बैठक संरक्षण मंत्रालयात (Ministry of Defense) सुरु आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सगळ्या बैठकांमध्ये सहभागी होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये दिल्लीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.