नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. दरम्यान आता पाकिस्तानला जबर लष्करी हादरा दिल्याची महत्वाची माहिती खुद्द हवाई दलाच्या प्रमुखांनी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक अवाक्स विमान पाडले, अशी माहिती हवाईदलप्रमुख ए.पी. सिंह यांनी बंगळुरूमध्ये आयोजित एअरचीफ मार्शल एल.एम. कात्रे व्याख्यानमालेदरम्यान दिली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राइकदरम्यान किती आणि काय-काय उद्ध्वस्त केले याची संपूर्ण सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे सांगितले. त्यांनी याचे फोटो देखील जाहीर केले आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी मोठा खुलासा केला.
भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टमने विमानं पाडली
भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या या विमानांना पाडले. त्यामध्ये एईडब्ल्यू अँड सी विमानाला तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबाबत भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच अधिकृतरीत्या माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताने देखील क्षेपणास्त्रांचा वापर केला. भारताच्या सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या लक्ष्यावर हल्ला केला, ज्यामध्ये रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या जनरल मुख्यालयाजवळील नूर खान एअरबेसला टार्गेट करण्यात आले होते. भारताने सलग दुसऱ्या दिवशी स्ट्राइक करुन पाकिस्तानचे दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले होते.
ते म्हणाले की याशिवाय शाहबाज जेकबाबाद विमानतळावरही हल्ला झाला. येथे एका एफ-१६ हँगरचा अर्धा भाग उद्ध्वस्त झाला. मला वाटते की हँगरच्या आत काही विमाने होती जी देखील हल्ल्यात उध्दवस्थ झाली आहेत. आम्ही मुरीदके आणि चकलाला सारख्या किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटरवरही हल्ला केला. यामध्ये सहा रडार नष्ट झाले. याशिवाय, आम्हाला एईडब्ल्यू अँड सी हँगरमध्ये किमान एक एईडब्ल्यू अँड सी आणि काही एफ-१६ विमाने असल्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यांची देखभाल तेथे सुरू होती. ते देखील उद्ध्वस्त झाले.
राजकीय इच्छाशक्तीमुळे साध्य झालं
हवाई दल प्रमुख म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमध्ये आमच्या यशाचे मुख्य कारण राजकीय इच्छाशक्तीची उपस्थिती होती. आम्हाला अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आमच्यावर कोणतेही बंधने लादण्यात आली नव्हती. जर काही अडथळा आला तर तो स्वतः निर्माण केला होता. आम्ही किती दूर जायचे हे ठरवले. आम्हाला त्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. आम्ही विचारपूर्वक हल्ले केले कारण आम्हाला त्याची खात्री हवी होती. तिन्ही दलांमध्ये समन्वय होता… सीडीएसच्या पदामुळे खरोखरच फरक पडला. ते आम्हाला एकत्र आणण्यासाठी होते. सर्व एजन्सींना एकत्र आणण्यात एनएसएनेही मोठी भूमिका बजावली.
हवाई दल प्रमुख म्हणाले की, हे एक हायटेक युद्ध होते. ८० ते ९० तासांच्या युद्धात आम्ही पाकिस्तानचे इतके नुकसान केले की त्यांना समजले की जर युद्ध सुरूच राहिले तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणून पाकिस्तान पुढे आला आणि आमच्या डीजीएमओंना संदेश पाठवला की आम्हाला चर्चा करायची आहे. आमच्याकडून ते मान्य करण्यात आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




