नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. २००४ नंतर ही पहिली घटना आहे. जेव्हा संसदेत पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर न देताच प्रस्ताव मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. विरोधकांच्या सततच्या निषेधामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आभार प्रस्तावावर विरोधकांच्या सुधारणा मांडल्या, ज्या फेटाळण्यात आल्या.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच खासदारांनी घोषणाबाजी केली. अवघ्या ६५ सेकंदात कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज दुपारी १२ वाजता सुरू झाले, परंतु पाच मिनिटांनीच दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखण्याचा मुद्दाही राज्यसभेत उपस्थित करण्यात आला.
अधिवेशनाचा आज ७ वा दिवस आहे. आज लोकसभेत गोंधळातच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आला. २००४ नंतर पुन्हा सभागृहाची परंपरा खंडित होत पंतप्रधानांच्या उत्तराविनाच हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षाच्या खासदारांचा गोंधळ आणि घोषणाबाजी यामुळे वारंवार सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात येत होते. ही परिस्थिती पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाची कार्यवाही स्थगित केली. गुरुवारी लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव वाचून दाखवला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. यावेळीही विरोधी खासदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.
अभुतपूर्व घटना
२००४ नंतर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी आभार प्रस्तावावर भाषण दिले नाही. २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग सभागृहात उपस्थित होते, परंतु तत्कालीन विरोधी पक्ष भाजपशी झालेल्या कराराचा भाग म्हणून त्यांनी त्यावर भाषण केले नाही. १० जून २००४ रोजी मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, आभार प्रस्तावावर थेट मतदान व्हावे यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाली आहे आणि म्हणूनच तो मतदानासाठी ठेवला पाहिजे.
गोंधळादरम्यान, काँग्रेस सदस्यांनी पंतप्रधान मोदींचे चित्र आणि “नरेंद्र सरेंडर” असे घोषवाक्य असलेले पोस्टर हातात घेऊन सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. वाराणसीतील गंगा नदीच्या काठावरील मणिकर्णिका घाटावर झालेल्या तोडफोडीचा मुद्दा उपस्थित करत समाजवादी पक्षाचे सदस्यही वेलमध्ये उतरले. त्यांच्या बॅनरवर राणी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा होत्या. तृणमूल काँग्रेसचे सदस्यही निषेध करण्यासाठी वेलमध्ये उतरले. द्रमुक आणि डाव्या पक्षांसारख्या इतर पक्षांच्या सदस्यांनीही गोंधळ घातला.





