मुंबई | Mumbai
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील (Gateway of India) समुद्रात एक प्रवासी बोट (Boat) बुडाल्याची घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाला ही बोट जात होती. या बोटमध्ये ८० प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली. त्यामध्ये ८० प्रवासी होते. त्यापैकी ६६ जणांना वाचविण्यात यश आले आहे.तर सदर ठिकाणी नौदल,जेएनपीट, कॉस्ट गार्ड यलोगेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे. तसेच या दुर्घटनेत एकाचा मृत्यू (Death) झाल्याचे समजते. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत.
नेमकं काय घडलं?
एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती. याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती. मुंबईपासून एलिफंटा हे जवळपास ३० किलोमीटरचे अंतर आहे. यासाठी ४० ते ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागतो. ३.३० च्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडियावरुन सुटली. त्यानंतर ५ ते ८ किमी आतमध्ये ही बोट गेली होती. तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.