नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ६) जम्मूमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. पंतप्रधान इंजिनमध्ये बसून चिनाब आर्च पुलावरून केबल स्टे अंजी पुलावर पोहोचले. तसेच, तब्बल १३४ वर्षांनी काश्मीरवासींच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. जम्मू ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह पूल बांधकाम कामगारांची भेट घेतली.जाणून घेवूया जगातील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची वैशिष्ट्ये.
काश्मीर खोर्याला देशाच्या अन्य भागाशी सुलभतेने जोडणारा एक भव्य पूल चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही तो अधिक उंच आहे. हा रेल्वे पूल ४० किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा स्फोट किंवा ८ रिश्टर स्केलची तीव्रता असलेल्या भूकंपाचा धक्काही सहन करू शकतो. विशेष म्हणजे स्फोटानंतरही या पुलावरून ताशी ३० किलोमीटर वेगाने रेल्वे जाऊ शकते. हा पूल 1,315 किलोमीटर लांबीचा असून तो ताशी 260 किलोमीटर वेगाने वाहणार्या वार्याचा आघात सहन करू शकतो. या पुलावर एक फुटपाथ आणि एक सायकल मार्गही बनवण्यात आला आहे.
चिनाब नदीवरील सर्वात उंच रेल्वे पूल बारामुल्लास उधमपूर-कटरा-काजीगुंडमार्गे जम्मूला जोडणारा आहे. या पुलाची लांबी 1315 मीटर आहे. त्यामध्ये 467 मीटरचा मेन आर्क स्पेस आहे. हा आतापर्यंत बनवलेल्या कोणत्याही ब्रॉड गेज लाईनवरील सर्वाधिक लांबीचा आर्क स्पॅन आहे. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवर (324 मीटर) पेक्षा 35 मीटर उंच आणि कुतुब मीनारपेक्षा सुमारे पाच पट अधिक उंचीचा आहे. हा चिनाब रेल्वे पूल विकासाच्या बाबतीत एक मैलाचा दगड ठरणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील हा चिनाब पूल भारताच्या पायाभूत सुविधांच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी हा चिनाब पूल महत्वाचा टप्पा मानला जात आहे. आज या पुलाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी या संपूर्ण पुलाची पाहणी केली आहे. चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर आता कटरा ते संगलदान दरम्यान ६३ किमीच्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे.
Rising boldly across the mountains, the Chenab Rail Bridge showcases design ingenuity and structural mastery. It will deepen connectivity, thus boosting trade, commerce and tourism. pic.twitter.com/mz2KVM8eGd
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2025
वेळ व खर्चाची बचत होणार
वंदे भारत ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ व खर्च दोन्हींची बचत होणार आहे. सुरुवातीला ही सेवा फक्त कटरा ते बारामुल्ला या दरम्यानच असेल आणि दररोज एकदाच चालवली जाणार असून मागणीनुसार तिची फेरी व प्रवासाचा विस्तार पुढे वाढवण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही ट्रेन जम्मूहून चालवली जाणार आहे. काश्मीरमध्ये तापमान अनेकदा शून्याखाली जाते, तरीही ही ट्रेन सुरू राहील. ट्रेनच्या विंडशील्डमध्ये हीटिंग एलिमेंट्स, पाण्याच्या टाक्यांमध्ये सिलिकॉन हीटिंग पेंड्स आणि भारतीय शैलीच्या शौचालयांमध्ये हीटर अशा अनेक सोयी या विशेष वंदे भारत ट्रेनमध्ये करण्यात आलेल्या आहेत. या विशेष वंदे भारत ट्रेनला एकूण डबे असणार आहेत. यामध्ये १ एक्झिक्युटिव्ह क्लास कोच आणि ७ एसी चेयर कार कोचेस असणार आहे. एकूण २७२ किमीचा प्रवास वंदे भारत ट्रेन करणार आहे.
३० हजार ३५० टन स्टीलचा वापर
दिल्लीतून काश्मीरमध्ये ट्रकमधून सामान येत असते. त्यामध्ये सुमारे 48 तासांपेक्षाही अधिक वेळ जातो. हा पूल सुरू झाल्यावर ट्रेनने मालवाहतूक केली जाऊ शकेल व वेळेत 20 ते 22 तासांची घट होईल. या पुलासाठी आतापर्यंत 30,350 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. नदीपासून 359 मीटर उंचीवर हा पूल आहे. हा पूल 120 वर्षे टिकून राहील असे त्याचे डिझाईन बनवलेले आहे. भारतीय अभियंत्यांच्या कौशल्याचे हा पूल एक प्रतीक बनला आहे.
चिनाब ब्रीजपासून अवघ्या १३ किमी अंतरावर असलेला अंजी खड्ड पूल देशातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. २००२मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने या चिनाब पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. आता या पुलामुळे कटरा-श्रीनगर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आरामदायी प्रवास करत लवकर पोहोचणे शक्य होणार आहे. चिनाब पुलाच्या बांधकामामुळे नदीच्या प्रवाहात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही तसेच नदीच्या पात्रात पुलासाठी खांबही उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हा पूल पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरला असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा