नवी दिल्ली | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला. त्यानंतर आज (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी थेट पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर (Adampur Airbase) जाऊन जवानांची भेट घेतली. यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांना संबोधित केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) हे भारताचे (India) न्यू नॉर्मल आहे. आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना (Terrorist) चिरडून टाकले असून, भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालणार नाही. तुम्ही सर्वजण देशाच्या वर्तमानासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक नवीन प्रेरणा बनला आहात. आज या वीरांच्या भूमीतून, मी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्व शूर सैनिकांना आणि बीएसएफच्या वीरांना सलाम करतो. तुमच्या शौर्यामुळे, ऑपरेशन सिंदूर जगभर गाजत असून प्रत्येक भारतीय तुमच्यासोबत आहे”, असे मोदींनी म्हटले.
पुढे बोलतांना मोदी म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर ही सामान्य सैन्य अभियान नाही. ही भारताची नीती, नियत आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे. भारत बौद्धांचीदेखील धरती आहे. तसेच गुरु गोविंद सिंह यांची देखील धरती आहे. धर्मासाठी शस्त्र उठवणं ही आमची परंपरा आहे. जेव्हा आमच्या बहीणी, मुलींच्या कपाळावरील कुंकू हिरावलं गेलं तेव्हा आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं. ते लपून बसले होते. पण ते विसरले की,त्यांनी ज्यांना ललकारले आहे ती हिंदुची सेना असून, भारताने फक्त सैन्य कारवाई (Action) स्थगित केली आहे”, असे त्यांनी म्ह्टले.
आता आमच्या वेळेनुसार आणि आमच्या स्टाईलने उत्तर देणार
यापुढे जर पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर भारत त्याला कठोर प्रत्युत्तर देईल. यासाठी भारताने आता तीन तत्वांवर निर्णय घेतला आहे. यात पहिलं तत्व जर, भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर, आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ. दुसरे तत्व भारत कोणताही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही आणि तिसरे तत्त्व आपण दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सरकार आणि त्यांच्या आकांना एकाच दृष्टीने पाहणार आहोत, असे मोदींनी सांगितले.
भारताकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर विध्वंस होईल
तुम्ही त्यांना समोरुन हल्ला करुन मारले. तुम्ही दहशतवाद्यांच्या मोठ्या अड्ड्यांना जमीनीत गाडले. दहशतवाद्यांची ९ अड्डे उद्ध्वस्त झाली आहे. १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या आकांना समजले आहे, भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले तर विध्वंस होईल. भारताच्या निर्दोष नागरिकांवर हल्ला केला तर त्याचा एकच परिणाम होणार तो म्हणजे विनाश आणि महाविनाश होणार, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.