नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मणिपूरमध्ये वांशिक संघर्ष उफाळून आल्यानंतर पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच मणिपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी चुराचंदपूरसह अनेक ठिकाणी भेट देत आहेत. तसेच चुराचंदपूर आणि इम्फाळ येथील विस्थापितांची भेट देखील ते घेत आहेत. यावेळी त्यांनी आपण मणिपूरच्या जनतेसोबत असल्याचे आश्वासन देत भारत सरकार तुमच्यासोबत असून मणिपूरमध्ये ७ हजार घरे बांधली जाणार आहेत. विस्थापितांसाठी ५०० कोटी रुपये देणार आहे. तसेच ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे, असे मोदी यांनी सभेमध्ये सांगितले.
मोदी यांनी मणिपूरच्या चुराचांदपूरमध्ये विविध विकासकामांची पायाभरणी केली. एका जाहीर सभेलाही संबोधित केले. मणिपूरच्या नावातच मणी आहे, हा तो मणी आहे जो आगामी काळात उत्तर पूर्व भारताची चमक वाढवणार आहे. मणिपूर हे बॉर्डरला लागून असलेले राज्य आहे, येथे दळणवळण नाही. त्यामुळे, तुम्हाला जी अडचण आहे, ती मी जाणतो. 2014 पासून मी या राज्याच्या विकासाकडे लक्ष देऊन होतो. शहरांसह गावागावात रस्ते पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील होतो. आता, राज्यात 8768 कोटी रुपयांच्या रस्त्यांचे काम सुरू असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.
“तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शांतता स्वीकारणे हा एकमेव मार्ग आहे. मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. पण दुर्दैवाने, या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडली होती. विकास कुठेही रुजण्यासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षांत, ईशान्येकडील अनेक संघर्ष आणि वाद सोडवले गेले आहेत. लोकांनी शांततेचा मार्ग निवडला आहे आणि विकासाला प्राधान्य दिले आहे. अलीकडेच डोंगर आणि दऱ्यांमधील विविध गटांशी करार करण्यात आले आहेत. शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम केले जात आहे, असे मोदी म्हणाले.
“मी सर्व संघटनांना शांततेच्या मार्गाने पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्याचे आवाहन करतो. आज मी तुम्हाला वचन देतो की मी तुमच्याबरोबर आहे. भारत सरकार तुमच्यासोबत, मणिपूरच्या लोकांसोबत आहे. मणिपूरमध्ये जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या कुटुंबांनी आपली घरे गमावली त्यांच्यासाठी आमचे सरकार ७,००० नवीन घरे बांधण्यास आम्ही मदत करत आहोत”, असेही आश्वासन मोदींनी यावेळी दिले आहे.
दरम्यान, प्रधानमंत्री मोदींच्याहस्ते आज चुराचांदपूर येथे 7,300 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन होत आहे. त्यानंतर, मणिपूरसह मिझोराम, आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यात भेट देणार आहेत. राज्यातील मिझोराम येथून आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेंना पंतप्रधान मोदींनी आज हिरवी झेंडी दाखवली. त्यामुळे, नॉर्थ इस्टमधील हे तीन राज्य आता थेट दिल्लीशी जोडले गेले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





