नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज २६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण झाले असून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. विकसित भारत बनवण्यासाठी आज देशात आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी यज्ञ सुरू आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. राजस्थानच्या बिकानेर येथे रेल्वेच्या पायाभूत विकासाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधानांच्याहस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणातून मोदींनी पुन्हा एकदा दहशतवादी आणि पाकिस्तानला थेट शब्दात इशारा दिला आहे. तसेच, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा.. असेही मोदींनी म्हटले.
पहलगाम हल्ल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी बिकानेरमधून पुन्हा थेट इशारा दिला आहे. आता चर्चा फक्त POK वर होणार असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. २२ एप्रिल पहलगाम हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर इथे बोलताना त्यांचे हे शब्द आहेत. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणा केल्या जात होत्या.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेर येथील जाहीर सभेत बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाम येथे निष्पापांवर गोळ्या झाडल्या गेल्या. पण त्या गोळ्या १४० कोटी भारतीयांना लागल्या. यानंतर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला होता की, दहशतवादाला मातीत गाडले जावे. आम्ही सैन्याच्या तीनही दलाला मोकळीक दिली. तीनही दलांनी असे चक्रव्यूह रचले की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले.” तसेच मोदींच्या धमन्यांत रक्त नाही तर गरम सिंदूर वाहतो, असेही पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
From Bikaner, launching projects aimed at augmenting rail infrastructure, connectivity, water and energy sectors. https://t.co/T7NkCweVrY
— Narendra Modi (@narendramodi) May 22, 2025
मोदी पुढे म्हणाले, २२ तारखेला झालेल्या हल्ल्याला उत्तर देताना, २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे ९ मोठे तळ उद्ध्वस्त केले. ज्या लोकांनी आपल्या बहिणींचे सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला, त्यांना आपण मातीत गाडले. जे लोक भारताच्या शांततेला कमकुवत समजत होते, आणि आपल्या शस्त्रांचा अहंकार करत होते, आज तेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. हे केवळ प्रतिशोध नव्हे, ही आहे नव्या न्यायाची भावना. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे जे रागातून नाही, तर न्यायासाठी वापरले गेले. जेव्हा देशातील महिलांच्या कपाळाचे कुंकू स्फोटके बनत तेव्हा काय होते, हे आम्ही दाखवून दिले, असेही मोदींनी म्हटले. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, देश नहीं झुकने दूंगा. जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हे हमने मिट्टी में मिलाया हैं, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
पाकिस्तान एक बात भूल गया कि अब मां भारती का सेवक मोदी यहां सीना तानकर खड़ा है।
मोदी का दिमाग ठंडा है, ठंडा रहता है, लेकिन मोदी का लहू गर्म होता है।
अब तो मोदी की नसों में लहू नहीं, गर्म सिंदूर बह रहा है।
– आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी pic.twitter.com/zwkteDAI82
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) May 22, 2025
आता फक्त PoK वर चर्चा होणार
आता पाकिस्तानसोबत कसलाही व्यापार आणि चर्चा होणार नाही. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. दहशतवाद नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरने तीन सूत्रे निश्चित केली आहेत. पहिले- जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल. त्यासाठी वेळ आपले सैन्य निश्चित करेल. दुसरे सूत्र म्हणजे, भारत अणुबॉम्बच्या धमक्यांना घाबरणार नाही. तिसरे – आम्ही दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे समजणार नाही. आम्ही ते एकच आहेत असे मानू. पाकिस्तानचा स्टेट आणि नॉन- स्टेट ॲक्टरवाला खेळ आता चालणार नाही, असे पीएम मोदींनी सुनावले.
दहशतवादाला चिरडून टाकण्याची हीच नीती आहे, हीच पद्धत आहे. हा भारत आहे, नवा भारत आहे, अशी गर्जना त्यांनी केली. जर पाकिस्तानने दहशतवाद्यांना खतपाणी घालणे सुरू ठेवले तर त्याला हक्काचे पाणी मिळणार नाही. भारतीयांच्या रक्ताशी खेळणे, आता पाकिस्तानला खूप महागात पडेल, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले, माझे मन शांत आहे, पण रक्त सळसळत आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला किंमत मोजावी लागेल. ती किंमत त्यांच्या लष्करालाही आणि अर्थव्यवस्थेलाही भोगावी लागेल. पाकिस्तानने नाल एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण यश आले नाही. उलट पाकिस्तानचे राहिमयार खान एअरबेस आज आयसीयूमध्ये आहे. ना व्यापार होणार, ना चर्चा.
देशाची मान झुकू देणार नाही
“एअर स्ट्राईकनंतर मी इथे आलो होतो तेव्हाच म्हणालो होतो की, या मातीची शपथ आहे, देशाची मान मी झुकू देणार नाही. आज राजस्थानच्या भूमीमधून देशातील नागरिकांना नम्रपणे सांगू इच्छितो की, जे लोक कुंकू (सिंदूर) पुसायला निघाले होते. त्यांना आम्ही मातीत गाडले. जे भारताचे रक्त सांडत होते, त्यांच्याकडून रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला आहे”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा