अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी व शारीरिक चाचण्या पार पडणार आहेत. या भरतीसाठी तब्बल 4 हजार 148 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित उमेदवार सहभागी झाले आहेत. पोलीस शिपाई भरतीसाठी किमान शैक्षणिक अर्हता 12 वी उत्तीर्ण अशी असतानाही, 1 हजार 409 पदवीधर व 208 पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरती प्रक्रियेत उतरले असल्याने बेरोजगारीचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 73 पोलीस शिपाई जागांसाठी एकुण 4 हजार 148 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज भरण्याची मुदत 28 ऑक्टोबर 2025 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत होती. मात्र, प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला सुरूवात झाली नव्हती. मध्यंतरी नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. 11 फेब्रुवारी पासून येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक व मैदानी चाचणीला सुरूवात होणार आहे. पहाटे पाच वाजल्यापासून भरतीसाठी येणारे तरूण- तरूणी यांना मैदानावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.
कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या पुरूषांना गोळाफेक, 100 मीटर व 1600 मीटर धावणे ही चाचणी द्यावी लागते. महिलांसाठी गोळाफेक, 100 मीटर व 800 मीटर धावणे ही चाचणी द्यावी लागते. दरम्यान, सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच सरकारी नोकरी मिळणे खूपच अवघड झाले आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याकडे तरूणाईचा कल दिसून येत आहे. या भरतीसाठी आलेल्या उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. सुरक्षित नोकरी प्राप्त करून भविष्यात मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
450 अधिकारी-कर्मचार्यांचा बंदोबस्त
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण भरती प्रक्रियेसाठी 45 अधिकारी, 350 पोलीस अंमलदार, 30 जिल्हा लिपिक कर्मचारी व वैद्यकीय सेवा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय भरतीमध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पथक तैनात असणार आहे. भरती प्रक्रियेसाठी पोलीस अधीक्षक घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून अल्पसंख्याक समाजाचा अधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
असे आहेत उच्चशिक्षित
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेल्या किमान पात्रतेपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या संख्येने मैदानात उतरल्याने, बेरोजगारीचे वास्तव आणि सरकारी नोकरीकडे असलेला वाढता ओढा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. या भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये बी.ए., बी.कॉम, बी.एससी, बी.ई., बी.टेक, बी.सी.ए., बी.बी.ए., एल.एल.बी. यांसारख्या विविध पदवी अभ्यासक्रमासह एम.ए., एम.कॉम, एम.एससी, ए.बी.ए., एम.सी.ए. एम.ई अशा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे.





