Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपोलीस स्मृती दिन : शहिद पोलिस वीरांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

पोलीस स्मृती दिन : शहिद पोलिस वीरांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबई | Mumbai

देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलिस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले, “गेल्या संपूर्ण वर्षात, भारतातील विविध पोलिस दलांमधील २६ पोलिस अधिकारी आणि २४० पोलिस अंमलदारांना असीम ध्येयनिष्ठेने आपले कर्तव्य बजावित असतांना वीरगती प्राप्त झाली, त्या वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आज आपण येथे एकत्र जमलो आहोत. त्या २६६ हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो.”

पोलीस स्मृतीदिन संचलन

भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय पोलिस जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस असून त्यांच्या देशभक्ती, कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन ‘पोलीस स्मृती दिना’निमित्त शहिद पोलिस वीरांना अभिवादन केले आहे.

देशांतर्गत कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय पोलिसांनी, प्रसंगी देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सरहद्दीवर युद्ध लढलं आहे. सीमेवर शत्रूशी लढताना, दहशतवादाचा, नक्षलवादाचा बिमोड करताना अनेक पोलिसांनी हौतात्म्य पत्करलं आहे. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी ते गेले आठ महिने जीवाची जोखीम पत्करुन अहोरात्र लढत आहेत. पाकिस्तान, चीनसारख्या शत्रूसैन्याशी लढण्यापासून मुंबईवरील दहशतवादी हल्ला नेस्तनाबूत करण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर भारतीय पोलिसांनी अतुलनीय शौर्य गाजवलं आहे असेही अजित पवार म्हणाले. नागरिकांच्या जिविताच्या, मालमत्तेच्या रक्षणाची, देशातंर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस अनेक आघाड्यांवर लढत असतात. देशात कायदा-सुव्यवस्थेचे रक्षण करुन नागरिकांना सुरक्षित व विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणारे पोलिसच असतात. पोलिस हे आपल्या सुरक्षेच्या बरोबरीने राष्ट्रनिर्माणाचेही काम करीत असतात. पोलिस दलातील आजी-माजी अधिकारी, जवान व त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस दलाबद्दलचा आदर व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलिसांकडून अभिवादन

आपले कर्तव्य पार पाडत असताना देशासाठी प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना पोलीस स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने आदरांजली. हे राष्ट्र त्यांचे बलिदान कधीच विसरणार नाही, अशा शब्दात महाराष्ट्र पोलिसांनी अभिवादन केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या