जळगाव | Jalgaon
गेल्या काही दिवसांपासून जळगावात राजकारण (Jalgaon Politics) तापले आहे. एकवेळ सहकारी असलेले पण सध्या ज्यांच्यातून विस्तवही जात नाही त्या गिरीश महाजन व एकनाथराव खडसेंचे (Girish Mahajan and Eknath Khadse) राजकीय युध्द व्यक्तीगत पातळीवर पोहचले आहे. हनीट्रॅप प्रकरणात प्रफुल्ल लोढा याच्याशी असलेल्या संबंधावरून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच जळगाव जिल्ह्यातील भाजपाने आपल्या आमदारांना खडसेंविरुध्द मैदानात उतरवले असून महाजनांच्या समर्थनार्थ खडसेंवर आरोप करीत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेला (Press Conference) वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगावचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या आरोपांचा निषेध करून सर्वांनी एकनाथ राव खडसे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
कारण नसताना बदनाम केले जातेय – राजूमामा भोळे
राज्यात महत्वाच्या मंत्र्यांपैकक्ष असलेल्या गिरीशभाऊंना खडसे कारण नसताना बदनाम करीत आहेत. ज्या लोढाचा ते हवाला देत आहेत. त्याचे कारनामे सर्वांना माहित आहे. आरोप करीत असताना त्याचे पुरावे समोर असायला हवेत पण एकच विषय वारंवार माध्यमांसमोर मांडून त्यांना काय साध्य करायचे हे त्यांनाच माहित नको त्या गोष्टी समोर आणून जिल्ह्याची बदनामी करणे त्यांनी थांबवावे अन्यथा त्याचे पडसाद योग्य उमटणार नाही. त्यामुळे आ. खडसे यांनी आरोप करतांना विचार करावा.
पक्ष तुमच्यामुळे नव्हे, कार्यकर्त्यांमुळे मोठा -आ. अमोल जावळे
एकनाथराव खडसे प्रत्येक वेळी सांगातात मी याला मोठं केलं, मी त्याला मोठ्ठ् केलं पण तुम्ही पक्ष सोडल्यानंतर देखील पक्ष वाढतच आहे. त्यामुळे हा पक्ष तुम्ही मोठा केला हा दावा करु नये, पक्ष तुमच्यामुळे मोठा नाही, आज गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास सुरु आहे त्यामुळे एखाद्या प्रकरणावरून त्यांना बदनाम करण्याचा खडसेंचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. आ. खडसेंनी अनेकांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त केले आहेत. आज तेच तोंड वर करून ना. महाजनांवर आरोप करीत आहेत.
दोघांनी सामंजस्याने वाद मिटवावा -ना. सावकारे
यावेळी बोलताना वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, नको त्या विषयाला महत्व देवून जिल्ह्याची बदनामी सुरु आहे. कधी काळी गिरीश महाजन व एकनाथराव खडसे यांनी एकत्र काम केले आहे. दोघांनीही एकमेकांच्या अंतर्गत बाबी माहिती आहेत. परंतु आता व्यक्तीगत पातळीवर टीका होत असून यात जिल्हा बदनाम होत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसत असून दोघही नेते मोठे आहेत, असे ते म्हणाले.
खडसे मातब्बर नव्हे तर भिक्कार नेता – आ. चव्हाण
एकनाथ खडसे मातब्बर नव्हे तर भिकार नेता असल्याची टीका चव्हाण यांनी केली. अर्ध्या माहितीच्या आधारे एकनाथ खडसे हे आमच्या नेत्यांची बदनामी करून जिल्ह्याचे नाव बदनाम करत आहेत. खडसेंना कोणी आडवा आले कायम त्यांनी त्याला आडवे केले. एकनाथ खडसे खरंच आपल्या आईचं दूध पिले असतील तर त्यांनी सर्व पुरावे जनतेसमोर आणावे. एकनाथ खडसे यांनी जेवढे आरोप केले ते एकही सिद्ध करू शकले नाही. एकनाथ खडसे म्हणजे तत्कालीन तोडीपाणी विरोधी पक्षनेता आहे, असे शरद पवार आणि राज ठाकरे यांचे शब्द आहेत. एकनाथ खडसे हे सपाट पावले आहे. एकनाथ खडसे यु टर्न करणारा सरडासारखा माणूस आहे, अशी घणाघाती टीका मंगेश चव्हाण यांनी केली.




