मुंबई | Mumbai
महायुतीला (Mahayuti) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २३७ जागांवर घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून निवडणुकीत ईव्हीममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला होता. यानंतर विरोधीपक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयुक्तांनी विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली होती. त्यानंतर आता लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “पूर्वी निवडणुकांमध्ये काही विचित्र गोष्टी होत असत. परंतु २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पूर्णपणे विचित्र आणि अनाकलनीय होती. या निवडणुकीत इतके गैरप्रकार झाले की, सर्व काही लपवण्याचे आटोकाट प्रयत्न करूनही काही गैरप्रकारांचे पुरावे समोर आलेच” असे म्हणत हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (शनिवार) काही वृत्तपत्रांना लेख लिहिले आहेत. त्यामध्ये पाच स्टेपमध्ये या षड्यंत्राचा आराखडा मांडला आहे. तसेच यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची (Election Commissioner) निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/ पुरावे लपविल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक ७.८३ टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हणत राहुल गांधींनी यासर्व घडामोडी ‘मॅच फिक्स’ असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले की, “२०२३ मध्ये झालेल्या कायद्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री २/ १ बहुमताने निवडणूक आयुक्त नियुक्त करतात. त्यामुळे या निवड प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसे महत्त्व नाही. तसेच न्यायाधीशांचा निर्णय देखील केंद्र सरकारच ठरवतं असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या घोटाळ्याबाबत राहुल गांधी म्हणतात की, २०२४ मधील महाराष्ट्रातील मतदारसंख्या ९.२९ कोटी होती. मात्र, नोव्हेंबर २०२४ मध्ये ती अचानक ९.७० कोटींवर पोहोचली आणि फक्त ६ महिन्यांत ४१ लाखांची वाढ झाली. यातील फक्त १५ लाख मतदारांनी मतदान केले, उर्वरित संशयास्पद आहे”, असेही त्यांनी म्हटले.
How to steal an election?
Maharashtra assembly elections in 2024 were a blueprint for rigging democracy.
My article shows how this happened, step by step:
Step 1: Rig the panel for appointing the Election Commission
Step 2: Add fake voters to the roll
Step 3: Inflate voter… pic.twitter.com/ntCwtPVXTu— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 7, 2025
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “मतदानाच्या (Voting) दिवशी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले होते. तर मतदानाची अंतिम आकडेवारी ६६.०५ टक्के इतकी होते. यात सांयकाळी पाचनंतर मतदानात ७.८३ टक्क्यांनी अचानक वाढ झाली. यामध्ये सुमारे ७६ लाख बनावट मते घातली गेली असावीत”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. तसेच ८५ विधानसभा मतदारसंघांमध्ये लक्ष्य करून बनावट मतदान झाले. भाजपला अनेक ठिकाणी अवास्तव मतं मिळाली. एका मतदारसंघात १,३४००० मतांपैकी भाजपला १.१९००० मते मिळाली. ही मते ८९ टक्क्यांपेक्षा जास्त होती. तर पारनेरमध्ये १.७५ लाख मतदार आणि भाजपला १.७५ लाख मते मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे याबाबत माहिती मागितली असता या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही आणि ईव्हीएम फुटेज देण्यास नकार दिला. सरकारने १९९१ निवडणूक नियमात बदल करून सीसीटीव्ही डेटा सार्वजनिक होऊ नये असे केले. याशिवाय EPIC कार्डवर एकसारखे क्रमांक दिसले, म्हणजे डुप्लिकेट मतदार होते, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.