नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रात २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत (Vidhansabha Election) मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि विरोधी पक्षाकडून केला जात आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयात देखील हा मुद्दा गेला होता. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप फेटाळले होते. तसेच विरोधी पक्षांनी कोणत्याही प्रकारची लिखित तक्रार नसल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेबाबत थेट सादरीकरण करत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप केला आहे.
यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाने (Election Commission) आम्हाला कधीच डिजिटल डेटा दिला नाही.महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे ४० लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे. आदित्य श्रीवास्तव नावाच्या एकाच व्यक्तीने कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केले आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधीनी केला.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे (Maharashtra) निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंकांना पुष्टी मिळाली की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे अशी आमची खात्री पटली. अनेक ठिकाणी यादीत लोकांचे फोटो नाहीत. त्याचवेळी, अनेक ठिकाणी बनावट पत्ते लिहिले गेले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या बूथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव आहे. मतदार यादीमध्ये अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिण्यात आलेले आहे” असे राहुल गांधी यांनी म्हटले.
महाराष्ट्रात पाच महिन्यात मतदार कसे वाढले?
महाराष्ट्रात ५ महिन्यांत बरेच नवीन मतदार जोडले गेले आहेत, हे ५ वर्षांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे आम्हाला शंका आली. आमच्या युतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, पण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजयी झालो. महाराष्ट्र निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आम्हाला संशय आहे. अचानक एक कोटी नवीन मतदार कुठून आले? आम्ही निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागितली, पण त्यांनी मतदार यादी दिली नाही”, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
एक लाख पेक्षा जास्त मतांची चोरी
मत चोरीवर बोलताना राहुल गांधी यांनी कर्नाटकातील विधानसभा निवडणुकींचे पुरावे दाखवले. ते म्हणाले की, बंगळूरूमध्ये लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी ६ मतदारसंघात भाजप पिछाडीवर आहे, परंतु महादेवपुरा येथे त्यांना एकतर्फी मत मिळाले. तेथे एक लाखापेक्षा जास्त मतांची चोरी झाली. एकाच पत्त्यावर ५०-५० मतदार होते, अनेक ठिकाणी नावे सारखीच होती, पण फोटो वेगवेगळे होते. जवळपास ११,९६५ डुप्लिकेट मतदार होते. तर ४० हजार मतदारांचा पत्ता बनावट होता”, असा दावाही राहुल गांधींनी केला.
निवडणूक आयोगाला विचारले प्रश्न
राहुल गांधींनी यावेळी निवडणूक आयोगाला देखील दोन प्रश्न विचारले. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? आम्ही वारंवार आयोगाकडे डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही. निवडणूक आयोगानेही आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला. तसेच देशात बनावट मतदान होत आहे. ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला. या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरी लिहिले आहे. तीन वेळा मतदान केलेले ११ हजार संशयास्पद लोक आहेत. हे लोक कुठून येत आहेत? एकाच पत्त्यावर ४६ मतदार आहेत”, असेही त्यांनी म्हटले.




