Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : "युतीच्या चर्चा आता तुमच्याशी..."; राज ठाकरेंचा संताप, नेमकं काय...

Raj Thackeray : “युतीच्या चर्चा आता तुमच्याशी…”; राज ठाकरेंचा संताप, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

मराठी विजयी मेळाव्यानंतर (Marathi Melava) राज्यात ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brother) युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. या युतीबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सकारात्मक असल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अद्यापही या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे युतीचा संभ्रम वाढत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मनसेचे राज्यस्तरीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

या शिबिरावेळी काही माध्यमांनी अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुका आल्यावर युतीबाबत ठरवू असं विधान केल्याच्या बातम्या झळकवल्या. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत सस्पेन्स निर्माण झाला. त्यानंतर आता खुद्द राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर (Socail Media) एक पोस्ट करत पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचे दिसत आहे. तसेच मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?

सस्नेह जय महाराष्ट्र,

१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असं विचारण्यात आलं, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असं उत्तर दिलं. त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रानी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का? कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका.

तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राने देखील शहानिशा न करता अशी बातमी टाकावी? सोशल मिडीयावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा! नशिबाने आजही असे अनेक प्रामाणिक संपादक आणि पत्रकार आहेत ज्यांना मी काय म्हणतोय हे कळत असेल! पत्रकारितेचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध हा १९८४ पासून आहे आणि आमच्या घरातच साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, नियतकालिकं जन्माला आली आहेत. माझाही व्यंगचित्रंकार म्हणून मार्मिक, लोकप्रभा, आवाज, लोकसत्ता ते सामना असा प्रवास झाला आहे, पत्रकारिता ही मी खुप जवळून अनुभवली आहे. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पत्रकारिता काय आणि कशी असते याची मला पूर्णपणे कल्पना आहे! त्यामुळे काही मोजक्या पत्रकारांना आणि त्यांच्या संपादकांना माझी विनंती आहे की हे असले प्रकार करू नका.

मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन !

आपला

।राज ठाकरे

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...