मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर (Election Commission) ‘मतचोरी’चा गंभीर आरोप केला होता. यानंतर काल (रविवारी) निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले. यावेळी निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींनी मतदारयाद्यांबाबत केलेल्या आरोपांबद्दल शपथपत्र द्यावं किंवा देशाची माफी मागावी, असे म्हटले होते.
त्यानंतर आता यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी निवडणूक आयुक्तांवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले की, “तुम्ही राहुल गांधींकडे अॅफिडेव्हीट मागत आहात, या देशातील ८० कोटी जनता अॅफिडेव्हीट द्यायला तयार आहे. पण अनुराग ठाकूर यांनीही तोच आरोप केला आहे”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदी बसलेल्या आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून मग्रुरी अपेक्षित नाही. हा अहंकार भाजपच्या (BJP) हस्तकांकडून अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणेच निवडणूक आयुक्त वागलेले आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) हे ज्या पक्षाची वकिली करत आहेत त्याच भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी यांच्याप्रमाणेच मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे. मग निवडणूक आयुक्तांनी अनुराग ठाकूर यांच्याकडे शपथपत्र का मागितले नाही?” असेही संजय राऊत यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी कोणत्या मतदारसंघात किती लाख मतांची चोरी झाली, हे सांगितले. मग या देशाच्या निवडणूक आयुक्तांची अनुराग ठाकूर यांच्याकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का? राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले, त्यातील एकाही प्रश्नाला निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलेले नाही”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.




