मुंबई | Mumbai
राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी ‘आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा’, असे म्हणत राजकीय संन्यासाचे संकेत दिले आहेत. तसेच पक्षात क्षमतेप्रमाणे जबाबदारी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय खासदार संजय राऊत प्रत्येकवेळी मला सावरण्याची भाषा करतात,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजीही व्यक्त केली आहे. यावर आता खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधतांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “भास्कर जाधव हे आमचे सहकारी असून, ते शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत.त्यांचा राजकारणामधील अनुभव अत्यंत दांडगा असून, चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदार्या दिल्या असून, त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत”, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.
तसेच “जेव्हा भास्कर जाधव मुंबईत (Mumbai) येतील, तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे आणि कडवट शिवसैनिक (Shivsainik) आहेत. भास्कर जाधव आक्रमक आणि छान बोलतात. त्यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? हे आम्ही नक्की समजून घेऊ,” असे संजय राऊत म्हणाले.




