नवी दिल्ली | New Delhi
केंद्रातील सत्ताधारी एनडीए (NDA) आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जेडीयूने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये जेडीयूचे सहा आमदार (MLA) निवडून आले होते, मात्र त्यातील या पाच आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर जो एक आमदार जेडीयूमध्ये होता, त्याने भाजपला दिलेला आपला पाठिंबा मागे घेतला आहे.त्यामुळे जरी मणिपूरमध्ये जेडीयूने भाजपचा पाठिंबा काढला असला तरी सरकारला कुठलाही धोका नसून सरकार स्थिर आहे.
मणिपूरच्या विधानसभेची सदस्यसंख्या ६० आहे. बहुमताचा आकडा ३१ आहे. भाजपचे ३७ आमदार आहेत.तर एनपीएफचे ५, एनपीपीचे ७ आमदार आहेत. नितीश यांच्या जेडीयूचा १ आमदार विधानसभेत आहे. तर काँग्रेसकडे ५, केपीएकडे २ आमदारांचे बळ आहे. मात्र, आता जेडीयूच्या एका आमदाराने आपला भाजपला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे. जेडीयूने भाजपचा मणिपूरमधील पाठिंबा काढला असला तरी आता सरकारला कुठलाही धोका नाही. मात्र, याचा परिणाम केंद्रातील सरकारवर होण्याची शक्यता आहे. कारण नितीश यांचा पक्ष दबावाचे राजकारण करुन बिहारमध्ये विधानसभेसाठी भाजपकडून अधिक जागा पदरात पाडून घेऊ शकतो. बिहारमध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गेल्या २ वर्षांपासून मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक आहे. दोन समुदायांमध्ये सातत्याने सुरु असलेल्या संघर्षामुळे मणिपूर सातत्याने धगधगतं राहिले आहे.मणिपूरमधील हिंसाचाराची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात भाजप सरकारला अपयश आल्याने कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर आता जेडीयूने मणिपुरात भाजपला धक्का दिला आहे. २०२२ मध्ये मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपने ३२, तर जेडीयूने ६ जागा जिंकल्या. पण भाजपने जेडीयूचे ५ आमदार गळाला लावले. त्यामुळे विधानसभेत पक्षाचे संख्याबळ ३७ वर पोहोचले होते. त्यातच आता मित्रपक्षानेच भाजपची साथ सोडली आहे. मणिपूरमध्ये भाजपकडे स्वबळावर बहुमत असले तरी नितीश कुमार यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
जेडीयूने केले अधिकृत पत्रक जारी
जेडीयूच्या मणिपूर प्रदेशाध्यक्षांनी एक अधिकृत पत्र जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले की, “आता मणिपुरात आम्ही भाजपच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचे समर्थन करत नाही. आमचा एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासीर आता विधानसभेत विरोधी बाकांवर बसेल”, असे प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.