नवी दिल्ली | New Delhi
काही दिवसांपूर्वी लोकसभेतील (Loksabha) विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा (Loksabha) आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे मतांची चोरी झाली हे प्रेझेन्टेशनद्वारे दाखविले होते. त्यामुळे निवडणूक आयोग आरोपांच्या पिंजऱ्यात सापडले आहे. यानंतर आज (दि.१६) रोजी पुन्हा एकदा राहुल गांधींनी ‘बेपत्ता मत’ या कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
त्यात ‘चोरी चोरी, चुपके चुपके आता नाही, जनता जागी झाली आहे, असे लिहिले आहे. पंरतु, निवडणूक आयोगाचा (Election Commission) उल्लेख कुठेही नाही. या व्हिडीओमध्ये (Video) “तुमच्या मताची चोरी म्हणजे हक्कांची चोरी आहे. चला आपण सर्वांनी मत चोरीविरूद्ध आवाज उठवूया आणि आपले हक्क वाचवूया”, असे म्हटले आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
एक व्यक्ती पोलीस ठाण्यात पोहोचते. तो घोरणाऱ्या पोलिसांशी बोलतो. सर, सर मला तक्रार लिहायची आहे. पोलिस म्हणतो, अरे, जर तुम्हाला येथे तक्रार लिहिली नाही तर तुम्ही काय कराल. मग ती व्यक्ती म्हणते की, मला चोरीचा अहवाल लिहायचा आहे. पोलीस म्हणतो, अरे, काय चोरीला गेले आहे. ती व्यक्ती म्हणते की सर मत चोरीला गेले आहे. यावेळी तो अधिकाऱ्यांना सांगतो की, लाखो मते चोरीला जात आहेत. यामुळे पोलिसांना प्रश्न पडतो की त्यांचे मतही चोरीला गेले आहे का? असे या व्हिडीओमध्ये आहे. जवळपास एक मिनिटाचा हा व्हिडिओ आहे.
निवडणूक आयोगाने राहुल गांधीकडून मागितले पुरावे
राहुल गांधीनी आपल्या पत्रकार परिषदेत कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात ०१ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा आणि एका महिलेने दोनदा मतदान केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी (सीईओ) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून मतचोरीचा दावा खरा वाटत असल्यास प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. जर त्यांना त्यांच्या दाव्यांवर विश्वास नसेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, असे म्हटले आहे.




