नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज एका खाजगी कार्यक्रमानिमित्त नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले आहेत. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
यावेळी राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी (CM) नुकतीच साधूसंतांसोबत नाशिकमध्ये कुंभमेळा बैठक घेतली. मात्र, शहराच्या विदारक अवस्थेकडे कुणाचेच लक्ष नाही. नाशिक (Nashik) शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ते पाण्याने तुंबत आहेत.एकेकाळी नाशिकला दत्तक घेतल्याची भाषा करणार्या फडणवीसांनी आता शहराचे अनाथ आश्रम केले आहे, अशी घणाघाती टीका यावेळी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी गाडी काढावी प्रत्येक पक्षाचे दोन-दोन माजी नगरसेवकसोबत घेऊन एकदा शहरात फेरफटका मारावा आणि या शहराची अवस्था बघावी. मागील तीन वर्षात प्रशासकीय काळात या शहराची काय वाट लावली एकदा त्यांनी याची डोळा पहावे, असे आव्हानही यावेळी त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, “राज्यात लवकरच २७ महापालिकांच्या निवडणुका (NMC Election) होण्याची शक्यता असून, गेली तीन वर्षे महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासक नेमून महापालिका लुटल्या जात आहेत. ही कसली लोकशाही? लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही. त्यांना प्राथमिक सुविधा होऊ द्यायच्या नाही, शेवटी न्यायालयाने (Court) खडेबोल सुनावल्यामुळेच आता तयारी सुरू झाली आहे”, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला.
अजित पवारांनी प्रायचीत्त म्हणून राजीनामा द्यावा
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) सरसकट सर्वांना लाभ देणे चुकीचे होते, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज माध्यमांशी बोलतांना दिली होती. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की,”मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाडक्या भावांनी नावे बदलून या योजनेचा लाभ घेतला, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याने या योजनेत मोठा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रायचीत्त म्हणून राजीनामा द्यावा, कारण हे पैसे अर्थखात्यातून गेले आहेत. राज्याच्या तिजोरीची लूट या योजनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिंदेंनी कोणत्या प्रश्नावर गांभीर्याने काम केले?
राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणत्या प्रश्नावर गांभीर्याने काम केले? टेंडर, ठेकेदारांकडून पैसे गोळा करणे आणि पैसे वाटणे हेच काम केले. अजित पवारही तेच करत आहेत. मुख्यमंत्रीही तेच करत आहेत. राज्याचे प्रश्न सोडवायचे कोणी, राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायचे कोणी? याबाबत त्यांच्याकडे काही नियोजन आहे असे वाटत नाही”,असेही संजय राऊत म्हणाले.
कुंभमेळा गुजरातचे ठेकेदारच लुटतील
नाशिक कुंभमेळयासाठी सहा हजार कोटी रूपयांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावर बोलतांना खासदार राऊत म्हणाले की, कुंभमेळा हा सांस्कृतिक आहे. तो उत्तम प्रकारे व्हायला हवा परंतु , कुंभमेळयाच्या नावाखाली सरकार पैशांची कशी लुट होणार आहे हे तुम्ही पहायला हवे. प्रयागराजमध्ये सगळे ठेकेदार गुजरातमधून आले होते. नाशिकमध्ये यापेक्षा वेगळे होईल असे काही वाटत नाही. ५ ते १० हजार कोटी हे गुजरातच्या ठेकेदाराकडेच जाणार आहे. सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरले आहे. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष किती कोटींचे काम होणार? आणि किती कोटी ठेकेदारांच्या खिशात जाणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोकाटेंसारखे अनेक मंत्री मंत्रीमंडळात
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे आपण अडचणीत येत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर बोलतांना राऊत म्हणाले की, अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या मंत्रीमंडळात आहे. ज्यांना या राज्याचे खरे प्रश्न समजलेच नाहीत. आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना या राज्यातील प्रश्नांबाबत किती गांभीर्य आहे? असेही राऊत म्हणाले.
भ्रष्टाचारामुळेच तिकीट कापलं, यावर ते गप्प का?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना, ज्यांनी सहा रुपयांत जमीन घेतली त्यांनी आरोप करू नयेत. मागच्या वेळी भ्रष्टाचारामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आले, यावर ते गप्प का? असा प्रतिप्रश्नही राऊतांनी केला.
पालकमंत्री जिल्ह्याची लुटमार करण्यासाठीच
नाशिकला पालकमंत्र्याची गरज काय? हे मुख्यमंत्री योग्यच बोलले. मंत्रिमंडळामुळे राज्याचे काही अडले नाही. इतकेच काय मुख्यमंत्री नसले तरी राज्य चालते. बाकीचे पालकमंत्री काय दिवे लावतात ते एकदा बघून घ्या. पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठीच नेमला जातो”, अशी टिकाही त्यांनी केली.
ईव्हीएमचा आरोप आणि हिंदुत्वावरून टोले
पश्चिम बंगाल निवडणुकांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विजयाच्या दाव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ” महाराष्ट्रातील सगळी ईव्हीएम बंगालला पाठवण्यासाठी पॅकिंग सुरू आहे, त्यामुळे अमित शहा जे म्हणाले ते खरं असावे. मुख्यमंत्र्यांनी ’आपण सर्व हिंदू आहोत’ असे विधान केल्यावर, ते शंकराचार्य झाले का? आता त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागणार का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.