नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरे गटाला (Thackeray Group) लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. पक्षाचे उपनेते राहिलेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ठाकरे गटाने पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी मागील महिन्यात भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यानंतर माजी महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी मागील आठवड्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले.
विलास शिंदे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने पक्षाचे उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांचे निकटवर्तीय मामा राजवाडे (Mama Rajwade) यांची आठवडाभरापूवी महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. मात्र, आता याच मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते आज दुपारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. यानंतर आता बागुल आणि राजवाडे यांच्या पक्षप्रवेशावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की. “भारतीय जमवा जमव पार्टीची कमाल आहे: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले…क्लायमॅक्स असा की: हे सगळे फरार (भाजपासाठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!”, अशा शब्दात त्यांनी पक्षप्रवेशावरून टीका केली आहे.





