मुंबई | Mumbai
मंत्री गिरीश महाजन यांनी काल माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे येत्या आठ दिवसांत कोण राहिलं हे कळेलं. संजय राऊतांच्या बडबडीमुळे आणि वागण्यामुळे सर्व त्रस्त आहेत. संजय राऊत आऊट ऑफ कंट्रोल झाले आहेत. पण हा पक्ष संपवण्याकरता संजय राऊत पुरेसे आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर आता या विधानावरून राऊतांनी पलटवार करत महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आज सकाळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “महाराष्ट्रातील सर्व भ्रष्ट, राष्ट्रद्रोही लोकांना एकत्र करून आताचा हा भाजप दिसत आहे. त्यातील हे महाशय आहेत. एकेकाळी भाजप हा पवित्र लोकांचा पक्ष होता, आज या पक्षाची सूत्र दलाल, भ्रष्ट, ठेकेदार यांच्याकडे आहे आणि हे लोक आमचा पक्ष संपवायला निघाले आहेत. हे लोक बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठं आहे. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, असा हल्लाबोल त्यांनी केला. तसेच गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेले दलाल आहेत, असा घणाघात देखील राऊतांनी केला.
राऊत पुढे म्हणाले की, “वेळ प्रत्येकाची येत असते. आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची जी भाषा तुम्ही वापरत आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने तुम्हाला चड्डीची नाडी बांधायला शिकवली. तुम्ही राजकारणात कोण होतात? आमचे काही लोक त्यांच्या बाजूला उभे राहून फोटो काढत होते, त्यावर आमचे लक्ष आहे. गिरीश महाजन जे बोलत आहेत, त्यांची भाषा त्यांच्या पक्षाला बुडवणार”, असेही त्यांनी म्हटले.
तसेच “शिवसेना ही संपण्यासाठी निर्माण झालेली नाही. आतापर्यंत अनेकजण या पक्षात आले, बाहेर पडले, त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली. अमित शहांनी (Amit Shah) शिवसेना संपवण्यासाठी जंग जंग पछाडले मात्र, शिवसेना संपली नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या १० पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. नाचेगिरी करणे म्हणजे राजकारण नाही”, असा हल्ला देखील राऊतांनी महाजन यांच्यावर चढवला.