शैलेंद्र तनपुरे
[email protected]
बडगुजर काही दिवसातच गिरीश महाजन यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दिसतील आणि पुढील चार वर्षात भाजपचे विधानसभेचे उमेदवार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. काळाचा महिमा किती अगाध असतो याचा प्रत्यय लोकांनाही येईल आणि बडगुजर यांना एवढे महत्व का मिळत होते याचे उत्तर त्यांना कदाचित मिळाले असेल.
सुधाकर बडगुजर हे नक्की कोण आहेत, असा प्रश्न गेल्या आठवड्यात समस्त राज्याला पडला होता. शिवसेना उद्धव ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी झाल्याची बातमी सर्वच माध्यमांनी अशी काही रंगवली की दस्तुरखुद्द बडगुजर यांनाही, मिळालेल्या प्रसिद्धीमुळे धक्का बसला असेल. ठाकरे गटाचे उपनेते हे त्यांचे पद होते म्हणून काही त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसावी. ते कमालीचे लोकप्रिय नेते होते म्हणूनही त्यांना एवढे महत्त्व मिळाले असे संभवत नाही.
पंचवीस लाख लोकसंख्येच्या नाशिक महानगरातील नवीन नाशिक या उपनगरातील बव्हंशी भागात प्रभाव असलेला नेता म्हणूनही त्यांचा एवढा उदोउदो झाला असण्याची शक्यता नाही. अगदी नाशिकमधीलही अनेकांना बडगुजरांवरील कारवाईला अतिरेकी महत्त्व दिले जाते, असे वाटत होते. हकालपट्टीची कारवाई तर नंतर राहिली बाजूला अन् ते कोणत्या पक्षात जाणार व संभाव्य पक्षातून लागलीच सुरु झालेला तीव्र विरोध याचीच चर्चा सुरु झाली. त्यानंतर मात्र ही कोणीतरी खरीच बडी आसामी दिसते, असे लोकांना वाटायला लागले.
स्थानिक आमदार सीमा हिरे यांनी मोठ्या त्वेषाने बडगुजरांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास आपला स्पष्ट विरोध असल्याचे जाहीर केले. शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी तर दहशतवाद्याशी संबंध असलेल्यांना आपल्या पक्षात स्थान नाही असे ठामपणे सांगितले. याचवेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी मात्र शिवसेनेच्या विचारांना मानणार्यांचे पक्षात स्वागत असल्याचे सांगितले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी विरोध केला नाही.
दुसर्या दिवशी तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजरांवर आऱोप असले तरी ते सिद्ध झालेले नाही असे स्पष्ट करीत एकापरीने त्यांच्या प्रवेशाचा मार्ग प्रशस्त केला. ज्या एका कृतीने बडगुजरांवर कारवाईची तत्परता दाखविली गेली ती म्हणजे, बडगुजर व मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट.
आता एवढ्या सगळ्या घडामोडी काही तासात घडल्यानंतर कार्यकर्ते तर बावचळलेच पण लोकांनाही हे काय चाललेय ते कळेना. यातूनच बडगुजर ही फारच बडी आसामी दिसतेय, असे लोकांना वाटायला लागले. हकालपट्टीनंतर दुखावलेले बडगुजर नंतरच्या माध्यमांमधील प्रसिद्धीच्या भडीमाराने मात्र सुखावले असतील. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणे ही खरी त्यामागील ग्यानबाची मेख होती, हे मात्र बडगुजरांनीही विसरता कामा नये.
अशी झाली हकालपट्टी
विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच शिवसेनेत खांदेपालटाची चर्चा सुरु झाली होती. दस्तुरखुद्द सुधाकर बडगुजर यांनीही सत्तारुढ पक्षांकडून होत असलेल्या त्रासामुळे आपल्याला पदापासून मुक्त करा, असा धोशा पक्षनेत्यांकडे लावला होता, असा त्यांचाच दावा आहे. त्याचवेळी होणार्या त्रासापासून मुक्तता मिळवायची असेल तर त्या संबंधित पक्षात डेरेदाखल होणे, याला पर्याय नाही याची त्यांना जाणीव झाली होती. मुलाबाळांवरही पोलिसी कारवाईची टांगती तलवार होती. त्यांच्या स्व:तवरही दहशतवादी सलिम कुत्ताबरोबरच्या कथित संबंधावरुन टीका, आरोप, संशय अन् संभ्रम होता. प्रत्यक्ष निवडणुकीतही यावरुन ते लक्ष्य तर झाले होतेच, शिवाय ऐन निवडणूक काळात त्यांच्या मुलावरही गुन्हा दाखल होवून त्याला थेट मोक्का लावला गेला होता. या सार्याच प्रकाराने हबकलेल्या बडगुजरांनी वेगळा विचार सुरु केला असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत होती.
पक्षातही संशयपिशाच्च घुसले होतेच. शिवसेनेला तशीही गळती लागलेली होतीच. दररोज नवनव्या नावांची यादी जाहीर होत असे. या पार्श्वभूमीवर बडगुजर अचानक गेले तर पंचाईत नको म्हणून पदांचा खांदेपालट करण्याची क्लृप्ती काढली गेली. बडगुजरांना पहिल्या बैठकीला टाळले. नंतर त्यांना बोलावले जाऊन त्यांच्याविषयीच्या संशयाला वाचा फोडली गेली. तेव्हाही त्यांनी आपण शिवसेनेतच असल्याचा पुनरुच्चार केला खरा, परंतु संशय काही फिटला नव्हता. साहजिकच मग खांदेपालट करतांना बडगुजरांकडील जिल्हाप्रमुखपद काढून ते डी.जी. सूर्यवंशी यांच्याकडे दिले गेले. महानगरप्रमुख विलास शिंदे यांना कायम ठेवले गेले. येथे पहिली ठिणगी पडली. बडगुजरांनी हे पद शिंदेंकडे देऊन महानगरप्रमुखपद केशव पोरजे यांच्याकडे द्यावे अशी सूचना केली होती. ती सपशेल झिडकारली गेली. त्याचवेळी आपल्याला बढती मिळेल अशी आशा विलास शिंदे यांना होती. त्यामुळे ते देखील नाराज झाले. ‘एक से भले दो’ अशी नाराजांची स्थिती झाली.
पक्षांतराच्या चर्चेत बडगुजरांबरोबरच शिंदेंचेही नाव यायला लागले ते यानंतर अधिक तीव्रतेने. तत्पूर्वी त्यांच्याबद्दल संशय होता. पण पद कायम राहिल्याने ते गप्प बसतील अशी अपेक्षा होती. याचवेळी शिंदेगटाकडूनही त्यांच्यावर जाळे टाकले जाऊ लागले होते. त्याची खरीखोटी माहिती बाहेर येत होती. संशयाचे वातावरण अधिकच गढूळ झाले होते. अखेरीस नाराज बडगुजरांकडे उपनेतेपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न केला गेला. संजय राऊत यांच्या विशेष प्रेमामुळेच हे घडले होते, हे काही वेगळे सांगायला नको.
मात्र, त्यानंतर माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड व उपनेते सुनील बागूल हा कोअर गृप व बडगुजर यांच्यातील दरी वाढत गेली. शिंदे यांच्या कन्येच्या विवाहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार हे जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ माजली. त्याचदिवशी बडगुजर पालिका कर्मचार्यांच्या समस्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीररित्या भेटले. त्याचदिवशी गिरीश महाजन यांनी शिवसेना संपविण्याची भाषा केली. सायंकाळी शिंदेंच्या विवाहसोहळ्यात महाजन, बडगुजर व्यासपीठावर दिसले. त्याचे छायाचित्र व्हायरल झाले.
एकापाठोपाठ घडलेल्या या सगळ्या घटनांमुळे शिवसेना ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली. तातडीने काहीतरी कारवाई झाली नाही तर भाजप व शिंदे गट आपले नाक कापतील अशी भीती व्यक्त केली गेली. दुसर्या दिवशी ठाकरे गटाने नाशकात पत्रकार परिषद ठेवली. त्याला बडगुजरांची गैरहजेरी ही या सार्या प्रकरणातील शेवटची काडी ठरली. पत्रकार परिषद चालू असतांनाच संजय राऊत यांनी फोन करुन बडगुजर यांची हकालपट्टी करण्याची घोषणा करायला लावली.
हा सारा घटनाक्रम एवढ्या वेगाने झाला की नेमके काय होतेय, काय चाललेय हेच कळेना. असे काही होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. दस्तुरखुद्द बडगुजर तर प्रचंड अस्वस्थ झाले. आपले गॉडफादर संजय राऊत असे काही तडकाफडकी करतील याचा त्यांना विश्वासच बसेना. आदल्या दिवशीच्या काही घटनांची कडी एकमेकाशी जोडली गेल्याने हकालपट्टीची कारवाई झाली हे खरे असले तरी महाजनांबरोबरच्या त्या कार्यक्रमात तेव्हा खासदार अरविंद सावंतांसह पक्षाचे इतर पदाधिकारीही होते, या वस्तुस्थितीकडे कानाडोळा केला गेला. ब़डगुजरांनी राऊतांकडे ही सफाई पेश करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही मन उडाले असल्याने त्यांना जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागला.
पुढे काय होणार?
सुधाकर बडगुजर हे खरे तर माजी महापौर दशरथ पाटील यांचे कार्यकर्ते. पालिकेत ठेकेदारी करतांनाच त्यांना राजकारणाचे स्वप्न पडायला लागले. पाटील यांचे बोट धरुन ते सक्रीय झाले खरे, पण नंतर त्यांनी पाटलाचे बोट अलगद सोडून शिवसेनेतील राऊतांसारख्या बड्या नेत्याचे थेट गळ्यातील ताईत बनले. हे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे होते. कारण अनेक संकटे आली, पण तब्बल अठरा वर्षे राऊत व बडगुजर यांच्या संबंधात कधीच फरक पडला नाही. संजय राऊत यांनी बडगुजर यांच्यासाठी अनेकदा स्थानिक संघटना अक्षरश: वेठीस धरली. त्यांच्यावर पदांची खैरात करतांना कोण नाराज होईल का याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. साहजिकच अनेक नेते तेव्हा राऊतांशी फटकून राहिले. काहींनी वेळीच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करुन आपला मार्ग बदलला.
शिवसेनेत रहायचे असेल व काम करायचे असेल तर राऊतांची मर्जी राखावी लागेलच व त्यासाठी बडगुजरांनाही झेलण्याशिवाय पर्याय नाही याची जळजळीत जाणीव झाल्यानंतर राहिलेले लोक तडजोड करु लागले. बडगुजर पक्षात सर्वेसर्वा झाले. पदांचे वाटप त्यांच्या मर्जीविना होणे अवघड झाले. तक्रारी करुनही फार काही फरक पडेनासा झाला. अर्थात बडगुजर पैशानेही गब्बर असल्याने ते पक्षासाठी हात सैल सोडत. कार्यक्रमांसाठी लागणारा पैसा ओघानेच त्यांच्याकडून येऊ लागला. महापालिकेत त्यांची चलती असल्याने हा पैसा ते खर्च करीत असले तरी ते काही उपकार करीत नाही, अशी त्यांच्या विरोधकांची भावना होती. केवळ बडगुजर यांच्यामुळे नाशिक पश्चिम विधानसभेची जागा ठाकरे गटाने आघाडीकडून खेचून घेतली. त्याचे फायदे-तोटे नंतर पक्षाने भोगले.
बडगुजर यांनी महानगरप्रमुख पद स्वीकारल्यानंतर संपूर्ण कार्यक्षेत्रात संघटनेची बांधणी केली. वारेमाप कार्यक्रम केले. पैसाही खर्च केला. भविष्यात काही मिळविण्यासाठी ही तेव्हा त्यांची गुंतवणूक होती. पण विधानसभेत दणकून पराभव झाला आणि घराचे वासेही फिरले. आज ते शिवसेनेला एका क्षणात परके झाले असून ज्या भाजपने त्यांच्यावर दहशतवादाचे भाईबंद असल्यासारखे आऱोप केले तोच भाजप पक्षांतर्गत विरोध झुगारुन त्यांच्यासाठी पायघड्या घालत आहे. राजकारण कसे अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलत असते याची प्रचीती या प्रकरणात नेमकेपणाने येते. आता पुढे काय, हा प्रश्न अनेकांना असला तरी सुधाकर बडगुजर नावाचे प्रासंगिक मोठे झालेले पुढारी येत्या काही दिवसात भारतीय जनता पक्षात दिमाखात प्रवेश करतील, त्यांना विरोध करणार्या आमदार सीमा हिरे दातओठ खात बसतील.
ठाकरे गटाचे लोक मात्र दीड तपानंतर पक्षांतर्गत मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करतील. शिंदे गटाचे काही नेते सुटकेचा निश्वास टाकतील. दस्तुरखुद्द बडगुजर काही दिवसातच गिरीश महाजन यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दिसतील आणि पुढील चार वर्षात भाजपचे विधानसभेचे उमेदवार झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. काळाचा महिमा किती अगाध असतो याचा प्रत्यय लोकांनाही येईल आणि बडगुजर यांना एवढे महत्व का मिळत होते याचे उत्तर त्यांना कदाचित मिळाले असेल. आमेन.. !