येवला | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १३ ऑक्टोबर १९३५ साली येवला येथील मुक्तीभूमीवर धर्मांतर प्रसंगी मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी १९५६ साली नागपूरला बौध्द धर्माची दिक्षा घेतली आणि लाखो दलितांना हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त केले त्यामुळे याठिकाणाला मुक्तीभूमी असे नाव देण्यात आले. दरवर्षी १३ ऑक्टोबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या वर्धापण दिनानिमित्त लाखो अनुयायी येऊन क्रांतीस्तंभाला मानवंदना करुन नतमस्तक होतात.
शुक्रवार दि.१३ रोजी ८८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे वर्धापण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सकाळी पंचशील ध्वजाचे पूजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर येवला शहरातून धम्म रॅली काढण्यात आली.
केंद्रात सरकार कोणाचं येेईल हे सांगता येत नाही मात्र २०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीनंतर तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत.पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेच्या किमान दोनशे बहात्तर जागांची आवश्यकता असते सध्यस्थितीत भारतीय जनता पक्षाला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे उदगार अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काढले.
काही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वर्धापन दिन सोहळ्यास संपूर्ण आंबेडकर कुटुंब,खासदार रामदास आठवलेंसह तालुक्यातील सामाजिक,राजकीय व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुक्ती भूमी प्रतिष्ठान येवला, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्यासह परिसरातील बहुसंख्य भीमसैनिकांनी परिश्रम घेतले. दिवसभर मुक्तीभूमी परिसर अनुयायांनी गजबजून गेला होता.