पुणे(प्रतिनिधी)
राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.
याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, तुम्ही एवढी हत्यारे, विकत घेता. पाणबुडय़ा घेता. जहाजे निर्माण करता. पण, त्या सगळय़ांचा उपयोग काय? पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही ठोस ऍक्शन घेणार आहात का? कागदी घोडे नाचवणे थांबवा. ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? जे काही दिसते, त्याला आर्मी उत्तर द्यायला तयार आहे. पण निर्णय घेण्याची राजकीय कमतरता निर्माण झाली आहे. म्हणूनच राज्यकर्त्यांनी काय तो एकदाचा निर्णय घ्यावा. सरकारला, शासनाला लोकांचा पाठिंबा आहे. लोक नक्कीच शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील.
दहशतवादाविरोधात विविध देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. तरीसुद्धा कारवाई होत नाही. माझे नेहमी म्हणणे असते. युद्ध करणे वा न करणे हा भाग वेगळा. पण जिथे हशतवाद्यांची टेनिंग सेंटर्स आहेत. ती उद्धवस्त केली पाहिजेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानच्या अंतर्गत आहेत. अशा वेळी तुम्हाला ते काय करतात? याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता? याचा पहिल्यांदा विचार होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी करार स्थगित करणार. मग नद्यांचे पाणी वापरणार कसे, अडवणार कसे, याचेही उत्तर मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
काही नेत्यांचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न
धर्म विचारून गोळी मारली, यावर काही होय म्हणतात, तर काही नाही म्हणतात. मात्र, काही राजकीय नेते नरेटीव्ह सेट करत आहेत. गेले ते भारतीय आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम पण मारले गेले आहेत, असे सांगत सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान जात नाहीत. म्हणजे ते किती गंभीर आहेत, हे लक्षात येते. मी बैठकीत असतो, तर वॉक आउट केले असते. सरकारने पर्यटकांना बाहेर काढणे, ही चूक केली. खरे तर त्यांना सपोर्ट द्यायला हवा होता. पर्यटकांच्या मनात भीती नव्हती. त्यांना सुरक्षा मिळणार की नाही, हा प्रश्न होता. सरकारने पर्यटकांचा खर्च करायला हवा होता, असे आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.