Saturday, May 17, 2025
Homeब्लॉगउचित गौरव

उचित गौरव

परमेश्वराने माणसाला दिल दिले आणि सांगितले ते तू स्वतःकडे ठेवायचे नाही. ज्या क्षणी द्यावेसे वाटेल त्याक्षणी मागचा पुढचा विचार न करता देऊन टाकायचे..आम्ही ते लक्षात ठेवले आणि आशा पारेखला तिच्या पहिल्याच चित्रपटात पाहिल्यावर तत्क्षणी ते तिला देऊन टाकले. तो सिनेमाही होता ‘दिल देके देखो..’ तिच्याबरोबर संगीतकार उषा खन्नाचाही हा पहिला सिनेमा! रांगड्या शम्मी कपूरबरोबर छान दिसली होती ती… त्यानंतर काही दिवसांनी तिचा दुसरा चित्रपट आला. तो पाहिल्यावर लक्षात आले, जब प्यार किसींसे होता है तो क्या होता है? एकसे एक बढकर एक गाणे, साथमे चॉकलेट हिरो देव आनंद आणि हे कमी नाही म्हणून की काय गोड गोड दिसणारी आशा पारेख..खरे सांगतो मी हा सिनेमा अडतीस वेळा पाहिला आहे. त्यातले ‘सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था’ हे गाणे तर मी काळजावर लिहून ठेवलेय… त्यानंतर आशाने मागे वळून पाहिले नाही आणि आम्हीही तिच्याशिवाय कोणाकडे वळून पाहिले नाही. (अर्थात माधुरी दीक्षित येईपर्यंत). निर्माता, दिग्दर्शक लेखक नासीर हुसेन तर तिच्यावर फिदा होताच… (आम्ही त्याला त्यावेळी आमचा प्रतिस्पर्धी समजायचो हा भाग वेगळा..).. त्याने हिट सिनेमांची फटाक्यांची माळच लावली. ‘फिर वही दिल लाया हूँ’, ‘तिसरी मंझील’, ‘बहारोंके सपने’, ‘प्यारका मौसम’, ‘कारवा’… किती नावे सांगू? जॉय मुखर्जीबरोबरचे ‘जिद्दी’ आणि ‘लव इन टोकियो’ हे तर विश्वजितच्या ‘मेरे सनम’सारखे म्युझिकल जॅकपॉट… जे ओमप्रकाशची ती लाडकी हिरोईन! ‘आ’पासून सुरू होणारे चित्रपट काढणारा हा निर्माता आशाला घेऊन अनेक हिट सिनेमे काढून गेला.

- Advertisement -

आज या सगळ्या ज्युबिली हिटस्ची आठवण येते आहे ते आशा पारेखजींना मिळालेल्या दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्डमुळे. सुरुवातीला ग्लॅमरस भूमिका आणि नृत्यनिपुण असल्याने वैविध्यपूर्ण डान्स असलेली गाणी त्यांच्या वाट्याला आली, पण कालांतराने त्यांना अभिनय करायला वाव असणार्‍या भूमिका मिळायला लागल्या. ‘कटी पतंग’ असाच एक चित्रपट! राजेश खन्नाबरोबरचा हा सिनेमा तिला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड देऊन गेला. माझ्या आठवणीत कायमचा राहिलेला सिनेमा मात्र मनोजकुमार बरोबरचा ‘दो बदन’…. ‘मैं तुलसी तेरे….’ पण तिच्या अभिनय कौशल्याला वाव देणारा सिनेमा होता. खूप वर्षांनी तिला ‘पगला कहींका’ शम्मी कपूर भेटला आणि दोघांनी आपल्या भूमिकेचे चीज केले.

वय दिसू लागल्यावर आशा पारेखने चरित्र भूमिका करायला सुरुवात केली. पण हे आपले डिपार्टमेंट नाही हे तिला जाणवले. राजेश खन्नाची एकेकाळची पडद्यावरची प्रेयसी ‘कालिया’मध्ये अमिताभ बच्चनची वहिनी बनते हे सत्य स्वीकारणे तिलाच काय, आम्हालाही जड गेले. मला वाटते तिने इथे थांबायचा विचार सुरू केला.. मग तिने दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. निर्मातीही बनली आणि शेवटी सेन्सर बोर्डाची अध्यक्ष बनली. इथे तिला कौतुक कमी आणि शिमगा जास्त हा अनुभव आला. अगदी जीवावर आल्यावर तिने बॉलिवूडला सायोनारा करायचा निर्णय घेतला असावा. त्यानंतर मात्र तिच्या वाट्याला एकापाठोपाठ एक अ‍ॅवॉर्डस् आली. पद्मश्री पण मिळाली, पण नुकताच जाहीर झालेला दादासाहेब फाळके पुरस्कार हा तिचा फिल्म इंडस्ट्रीने दिलेला सर्वोत्तम सन्मान ठरावा. आज ती स्वतःची डान्स अकादमी चालवते. स्वतःच्या नावाच्या आशा पारेख ट्रस्ट हॉस्पिटलच्या कामात जातीने लक्ष घालते. ‘जिया हो जिया हो जिया कुछ बोल दो’ म्हणून सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या आशा पारेखने वैयक्तिक आयुष्यातही नीतिमूल्ये पाळली. कागदी फुले आणि काचेचा चंद्र असणार्‍या बेगडी रुपेरी दुनियेत म्हणूनच ती सन्मानपात्र अभिनेत्री ठरली.

– डॉ. अरुण स्वादी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dr. Tanpure Sugar Factory Elections : डॉ. तनपुरे कारखाना निवडणुकीत तिरंगी...

0
राहुरी (तालुका प्रतिनिधी) राहुरी येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या काल शेवटच्या दिवशी ११६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले...