अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 141 टक्के पाऊस झालेला आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून उन्हाचा चटका वाढत असून अनेक ठिकाणी भू गर्भातील पाण्याची पातळी झापट्याने कमी होतांना दिसत आहे. यामुळे पाणी टंचाईची शक्यता वाढली असून ऐनवेळी पाण्याचे सरकार टँकर सुरू करण्यास अडचण येवू नयेत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी त्यांना असणारे पाण्याचे टँकर मंजूरीचे अधिकार प्रांताधिकारी यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आज (1 एप्रिलपासून) अंमलबजावणी होणार आहे.
मुबलक पावसानंतर नगर जिल्ह्यात दरवर्षी पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, असा अनुभव आहे. या वर्षी गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढतांना दिसत आहे. मार्च महिन्यांत अचानक तापमान 38 डिग्रीपर्यंत पोहचले होते. एप्रिल आणि मे महिन्यांत हे तापमान वाढण्याची शक्यता असून यामुळे काही ठराविक भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी धावपळ नको अथवा अचानक मागणी झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यास उशीर नको, यामुळे आधीच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांनी शासनाच्या दोन वर्षापूर्वीच्या आदेशाचा आधार घेत त्यांच्याकडे असणारे पाण्याचे टँकर मंजूरीचे अधिकारी आज 1 एप्रिलपासून प्रांताधिकारी यांना प्रदान केले आहेत. यामुळे मागणी आल्यानंतर तात्काल सुलभ पध्दतीने तालुका पातळीवर पाण्याचे टँकर सुरू करता येणार आहेत.
दोन वर्षापूर्वीच्या शासन आदेशाचा आधार घेत आजपासून पाण्याचे टँकर मंजूरीचे आदेश प्रांताधिकारी यांच्या पातळीवर देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील धरणात मुबलक पाणी साठा आहे. मात्र, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाण्याची मागणी वाढू शकते. टँकर मंजूरीच्या कामात सुलभता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– डॉ. पंकज आसिया, जिल्हाधिकारी, नगर.
25 हजार नागरिकांच्या घशाला कोरड
जिल्ह्यात सध्या 15 गावे आणि 35 वाड्या वस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू आहेत. या ठिकाणी 10 टँकरव्दारे 24 हजार 994 नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. यात संगमनेर तालुक्यातील 13 गावे आणि 29 वाड्यांवर 9 टँकरव्दारे 23 हजार हजार नागरिकांना, तर नगर तालुक्यातील 2 गावे आणि एक वाडीवर एका टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.