पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्या तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल फिरविण्याची किमया असलेल्या पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंच व 17 सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरु झालेली आहे. 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरु झाले असले तरी अजूनतरी अर्ज भरण्यासाठी पाहिजे तसा वेग आलेला नाही याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येक पॅनेल प्रमुख योग्य व विश्वासू आणि एकनिष्ठ उमेदवाराचा शोध घेऊन मगच उमदेवारी बाबत निर्णय घेणार आहे.
विशेष म्हणजे सर्व गटांनी गाठीभेटी व बैठकांवर भर दिलेला आहे. मात्र बैठकीत रात्री निश्चीत केलेली नावे दुसर्या दिवशी बदलत असल्यामुळे व काही नकार देत असल्यामुळे पॅनेल प्रमुखांसमोर आव्हान उभे राहिले आहे. उमेदवाराची निश्चिती करताना त्यांची कागदपत्रे गोळा करणे, ग्रामपंचायतीची थकबाकी भरणे यासह अनेक कामे पॅनेल प्रमुखांना करावी लागत आहेत. त्यातच सर्व गटांनी यावेळेस आपली सत्ता येणार असा होरा सुरु केला असला तरी मतदारांच्या कलाचा नेमका अंदाज येत नसल्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहे.
मागच्या वेळी डॉ. धनंजय धनवटे यांची प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली होती. 17 पैकी 11 सदस्य जनसेवा मंडळ, 4 सदस्य पुणतांबा विकास आघाडी तर 2 सदस्य लोकसेवा मंडळाचे निवडून आले होते. मागील निवडणुकीत चौरंगी लढत होती. मात्र या वेळेस मनसेचे तालुकाप्रमुख गणेश जाधव यांनी स्वतंत्र पॅनेल उभे करणार असे जाहीर केल्यामुळे पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या वेळेस सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी महिला उमेदवार कोण असावी यासाठी रात्रंदिवस सर्व पॅनेल प्रमुखांचा खल सुरू आहे. कारण पुणतांबा ग्राम पंचायतीचा कारभार पाहणे सोपे नाही. येथील ग्रामस्थ अत्यंत जागरूक व संवेदनशील आहेत. त्यामुळे सरपंच पदाच्या उमदेवारीवरच पॅनेलचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
पुणतांबा रास्तापूर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक 3 कोटी पेक्षा जास्त आहे. ग्रामनिधी व पाणीपुरवठा थकित धरून अंदाजे अडीच कोटी पर्यंत आहे. 15 व्या वित्त आयोगाचा 70 ते 80 लाखापर्यंत निधी येतो. दलित वस्ती सुधारणा योजनेचा निधी 20 लाखावरून 40 लाखापर्यंत झाला आहे. पुणताबा-रास्तापूर अंतर्गत अंदाजे 40 दलित वस्त्या आहे. जन सुविधा रस्ते त्यांचे डांबरीकरण यासाठीही आमदार, खासदार यांच्या कोट्यातील निधी उपलबध होतो. पुणतांबा ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून सध्या जल स्वराज टप्पा-2 व जलजीवन मिशन योजने अंतर्गत दोन्ही मिळून 33 कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. सध्या गावातील ग्रामस्थांना किती स्वच्छ, किती वेळ व किती दिवसांनी पाणी मिळते याची जाणीव पुणतांबेकरांना आहे.
निवडणुकीत पाणीप्रश्न मुख्य असल्यास कोणालाही नवल वाटणार नाही. पुणतांबा रास्तापूर ग्रामपंचायत निवडणुकीकडे ना. विखे, आ. काळे, माजी आ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तिघांचेही पॅनेल असतात. त्याचे नेतृत्व स्थानिक नेते करतात. गावातील काही नेतेही स्वतंत्र पॅनेल उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच महाविकास आघाडी करून स्वतंत्र पॅनेल निवडणूक रिंगणात उभे करण्याची कालपर्यंत चर्चा होती मात्र त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर शक्यतो लढविल्या जात नाही. स्थानिक युती किंवा आघाडी असतात. ग्रामपंचायतीमध्ये कोणाची सत्ता येणार त्यावरच कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराचे काही अंशी भवितव्य अवलंबून राहणार आहे. विशेष म्हणजे गणेश कारखान्या पेक्षाही जास्त चुरशीने ही ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याचे चित्र समोर येत आहे.