पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
पुणतांबा गावाला भेडसावणार्या पाणीटंचाई समस्या तसेच वाडी-वस्तीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मंजूर झालेल्या 33 कोटीच्या दोन पाणी योजनांच्या कामातील अनेक त्रुटी व अनियमितपणामुळे पाणी प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर झाला. गावाला सात दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
पुणतांबा-रास्तापूर गावासाठी मंजूर होऊन प्रत्यक्ष काम सुरू झालेल्या जलस्वराज टप्पा क्र. 2 ही 17 कोटी व जलजीवन मिशन 16 कोटी या दोन योजनांचे एकूण 33 कोटी रुपये खर्चाच्या योजनेतील जल स्वराज्य टप्पा क्र. 2 अंतर्गत जलवाहिनी, नवीन साठवण तलाव, चार जलकुंभ आदी कामे पूर्ण झाली. या कामात अनेक त्रुटी व अनियमितता झाल्यामुळे पाणी योजना समिती सचिव वंदना धनवटे व शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी मंत्रालयात तक्रारी केल्या. याची ना अधिकार्यांनी दखल घेतली ना पदाधिकार्यांनी. गावच्या अंतर्गत पाणी वितरण व्यवस्थेवर नागरिकांनी ग्रामसभेत व जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये पाणी योजनेच्या कामातील त्रुटीवर वादळी चर्चा झाली. परंतु योजनेच्या कामात सुधारणा झाली नाही. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदारांचा सब ठेकेदार यांनी चुकीची कामे करून गावचा पाणी प्रश्न अधिक गुंतागुंतीचा करून ठेवला. त्यामुळे गावाला कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
ना. विखेंना ग्रामस्थ भेटणार
ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक वर्षांचा गावचा पाणीप्रश्न संपविण्यासाठी 33 कोटी 99 लाख रुपयांच्या दोन पाणीयोजना मंजूर केल्या परंतु आज सात दिवसांच्या अंतराने गावाला पाणीपुरवठा होत आहे. योजनांची अंमलबजावणी योग्य झाली नाही. ग्रामस्थ ना. विखेंना भेटून पाणी योजनेतील त्रुटी सांगून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
जलस्वराज टप्पा क्र.2 या योजनेतील अनेक त्रुटी आमच्या ग्रामपंचायत सत्ता काळात मंत्रालयीन सचिव स्तरावर निदर्शनास आणून दिल्या. योजना रद्द करण्याची वेळ आली. यात विरोधक राजकारण करतील म्हणून ही योजना राबविली. आमच्या सत्ता काळात याच योजनेतून एक दिवसाच्या अंतराने पाणीपुरवठा केला परंतु ग्रामपंचायत नियोजनात कुणीही हस्तक्षेप करत असल्यामुळे सध्या सात दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे.
– डॉ. धनंजय धनवटे