अकोले | Akole
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात जंगी सभा घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी १० दिवसांत आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते अकोल्यात बोलत होते.
ओबीसीमधून आरक्षण द्या, ही जरांगे यांची मागणी चुकीची आहे, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण ही पहिल्या लढ्यापासूनची मागणी आहे. आमचा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला विरोध नाही. मात्र ओबीसीमधून आरक्षण मागणं योग्य नाही, निजाम काळातील कुणबी दाखले मिळत असतील तर हरकत नाही. मात्र कुणाच्या आरक्षणात आम्हाला वाटा नको ही भूमिका हवी असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला देखील टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना न्यायालयात आरक्षण टीकलं होतं. मात्र मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे.