दिल्ली । Delhi
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना “प्रधानमंत्री विकास भारत योजना” जाहीर केली. या योजनेद्वारे खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना १५,००० रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ३.५ कोटी तरुणांना याचा लाभ मिळेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र, या घोषणेवर काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर एका पोस्टद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. “एक लाख कोटी रुपयांचा जुमला – सीझन २! गेल्या ११ वर्षांपासून मोदीजींची तीच जुनी नारी आणि तेच आकडे,” असे त्यांनी म्हटले. गेल्या वर्षी सरकारने एक लाख कोटींच्या गुंतवणुकीतून एक कोटी इंटर्नशिप देण्याचे आश्वासन दिले होते. यंदाही पुन्हा एक लाख कोटींची नोकरी योजना जाहीर करण्यात आली आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांची एक प्रतही एक्सवर शेअर केली. त्यांनी सांगितले की, सरकारने संसदेत कबूल केले आहे की, गेल्या वर्षी केवळ १०,००० पेक्षा कमी इंटर्नशिप देण्यात आल्या. “इंटर्नशिपमधील वेतन इतके कमी होते की ९० टक्के तरुणांनी ही संधी नाकारली,” असा आरोप राहुल यांनी केला. त्यांनी पुढे म्हटले, “मोदी सरकारकडे आता कोणतेही नवे विचार नाहीत. तरुणांना फक्त मोठमोठ्या घोषणा मिळतात, नोकऱ्या मिळत नाहीत.”
पंतप्रधान मोदींनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. “प्रधानमंत्री विकास भारत योजना” ही तरुणांना आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना तरुणांना नोकरीवर घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.




