मुंबई | Mumbai
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घालायला सुरूवात केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून येणाऱ्या काळातही हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
तसेच पुणे, नाशिक, अहमदनगर या भागातही पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाकडून राज्यात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागाने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याच्या प्रभावामुळं कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहित देखील देण्यात आली आहे.