नाशिक । प्रतिनिधी Nashik
मान्सून पूर्णपणे माघारी गेल्यानंतरही बंगालच्या उपसागरातील ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील डिप्रेशन यांच्या अवशेषांमुळे गेल्या १०-१२ दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पूरस्थिती आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ही प्रणाली आता संपुष्टात येत असल्याने राज्यात हळूहळू वातावरण निवळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
चक्रीवादळे संपुष्टात
‘ बंगालच्या उपसागरातील मोंथा’ चक्रीवादळ शनिवारी (दि.१ ) हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे विरळले. अरबी समुद्रातील डिप्रेशन: सोमवारी (दि.३) गुजरातमधील कच्छच्या आखातात हे कमी दाबाचे क्षेत्र संपण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात वातावरण निवळत असले तरी मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांत सोमवारी तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. विशेषतः खालील जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव जास्त जाणवेल.
मुंबई, ठाणे, पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगांव,छत्रपती संभाजीनगर, उत्तर अहिल्यानगर,कोल्हापूर, सांगली, सोलापूर
मुंबई आणि ठाणे उपनगरांत सकाळी किंवा दुपारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात ढगाळ हवामान, नंतर थंडीची चाहूल लागणार आहे. दि.४ ते ६ नोव्हेंबर (मंगळवार ते गुरुवार) केवळ ढगाळ वातावरण राहील.पावसाची शक्यता नाही. शुक्रवार (दि.७ ) पासून पावसाळी वातावरण काही दिवसांसाठी पूर्णपणे निवळण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.८) पासून हळूहळू थंडीची चाहूल लागणार आहे.तथापि, नोव्हेंबर महिन्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अतिजोरदार थंडीची शक्यता सध्या दिसत नाही.
बंगालच्या उपसागरात ब्रम्हदेश आणि बांगलादेश किनारपट्टीदरम्यान पुन्हा नवीन कमी दाब क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत ते वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी, हवामानातील बदलानुसार नागरिकांनी सतर्क रहावे, असा सल्ला हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.




