मुंबई | Mumbai
महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं असून, पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे. मात्र अभिनंदन करताना राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना इशारादेखील दिलाय. सरकार चुकतेय, लोकांना गृहीत धरतेय असे जर जाणवले, तर आम्ही विधिमंडळाच्या बाहेर सरकारला त्यांची चूक जाणवून देऊ, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना दिलाय.
काय म्हंटले राज ठाकरेंनी?
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचे अभिनंदन. २०१९ ला खरेतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडले त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा, असेही राज ठाकरे यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.