Tuesday, September 17, 2024
HomeराजकीयRaj Thackeray : सणासुदीच्या तोंडावर काढणीला आलेलं पीक गेलं, शेतकरीही 'लाडका' असल्याचं…;...

Raj Thackeray : सणासुदीच्या तोंडावर काढणीला आलेलं पीक गेलं, शेतकरीही ‘लाडका’ असल्याचं…; राज ठाकरेंचं ट्विट चर्चेत

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार केला. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतामधील पिकं जमीनदोस्त झाली आहेत.

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी ट्विट करत मराठवाड्याच्या स्थितीवर भाष्य केले आहे.

काय आहे राज ठाकरे यांचे ट्विट?

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.

तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !

या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं.

राज ठाकरे

- Advertisment -

ताज्या बातम्या