मुंबई । Mumbai
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल (११ जानेवारी) मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांची संयुक्त सभा पार पडली. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. “भाजप हा अदानींच्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत आहे,” असा गंभीर आरोप करत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सभेच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी केवळ भाषणावर भर न देता पुराव्यांसह भाजपला घेरले. त्यांनी मैदानातील मोठ्या पडद्यावर एका व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे अदानी समूहाचा विस्तार दाखवला. यात देशभरातील अदानींचे प्रकल्प आणि विशेषतः महाराष्ट्र व मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. मुंबईच्या मोक्याच्या जागा कशा प्रकारे एकाच उद्योगपतीच्या ताब्यात जात आहेत, याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुंबईतील विमानतळ आणि बंदरांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, “मुंबईला कशा प्रकारे विळखा घातला जातोय, याचा तुम्हाला अंदाजही नाही. वाढवण बंदर येतेय, त्याच्या बाजूला विमानतळ उभारले जात आहे. मुंबई विमानतळावरील ‘कार्गो’ तिकडे हलवण्याचा हालचाली सुरू आहेत. हळूहळू आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ नवी मुंबईला नेले जातील आणि नंतर मुंबईचे विमानतळ विकायला काढले जाईल.”
भाजपच्या धोरणांवर प्रहार करताना राज ठाकरे यांनी भौगोलिक संदर्भांचा वापर केला. त्यांनी आरोप केला की, मुंबई थेट गुजरातला जोडण्यासाठी पालघर आणि ठाणे जिल्ह्यांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “यांच्या डोक्यात पहिल्यापासून मुंबई गुजरातला न्यायची आहे. त्यासाठी आधी पालघर आणि ठाणे ताब्यात घ्यावे लागेल, तरच मुंबईपर्यंत पोहोचता येईल. हा सगळा आखलेला प्लॅन आहे,” असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी राज्यातील सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला. “सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली आहे. आपण जातीपातीच्या वादात अडकून बेसावध आहोत, आणि याचाच फायदा घेऊन मुंबई हातातून घालवण्याचे प्रयत्न होत आहेत. एकदा का मुंबई हातातून गेली, तर महाराष्ट्राची अवस्था झारखंडपेक्षा वेगळी उरणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. विधानसभेत जे राजकारण झाले, तेच आता महापालिका निवडणुकीत करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.





