अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अकोले तालुक्यातील राजूर गावात दूषित पाण्यामुळे काविळसह जलजन्य आजारांचा उद्रेक झाला असून या ठिकाणी आरोग्य विभागाकडून 35 पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकात 50 आरोग्य सेवक, 9 आशा सेविका, 10 आरोग्य पर्यवेक्षक आणि 10 मेडिकल ऑफिसर यांचा समावेश असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दोनदा राजूर गावात भेट दिली आहे. दरम्यान 140 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
राजूर गावाला पाणीपुरवठा करणारे पाण्याचे स्त्रोत दूषित झाल्याने गावातील काविळ आणि जलजन्य आजारांचा उद्रेक झाला. यात 140 मुलांना काविळसह अन्य जलजन्य आजाराची बाधा झाली. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून काही रुग्णांवर गरजेनुसार मुंंबई, पुणे आणि संगमनेर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. गावात सध्या आरोग्य विभागाच्या 35 पथके कार्यरत असून ते घरोघरी जावून नागरिकांना पाणी उकळून प्यावे आणि आजाराशी काही लक्षणे दिसून आल्यास गरजेनूसार पुढील वैद्यकीय उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.
या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली असून गावात दुषित झालेल्या पाणी स्त्रोताची पाहणी त्यांनी केली. तसेच गावातील पाणी शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित करून घेतला असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. सध्या राजूर गावात 35 पथकात 50 आरोग्य सेवक, 9 आशा सेविका, 10 सुपरवायजर आणि 10 मेडिकला ऑफिसर काविळच्या उद्रेकावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
ग्रामीण रुग्णालयात जादा डॉक्टरांची नेमणूक
राजूर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. याठिकाणी जलजन्य आजारांच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी तीन अतिरिक्त डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यात फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ आणि आणखी भूलतज्ज्ञ अशा तिघांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी काढले आहेत.