नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑपरेशन सिंदूरवरून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना पकडण्यात अद्याप यश का आलेले नाही, असा सवाल केला.विरोधकांनी या मुद्द्यांवर तातडीने चर्चा घेण्याची मागणी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहे काही काळासाठी स्थगित करण्यात आली.
राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर टीका सुरु केली आहे. यानंतर विरोधकांकडून सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली गेली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्याप पकडले गेलेले नाहीत. त्यांना मारलेही गेलेले नाही. ट्रम्प यांनी २४ वेळा सांगितले आहे की आम्ही युद्ध थांबवले. हे देशासाठी अपमानजनक आहे. सरकारने या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी खर्गे यांनी केली.
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर यांनी देखील कबूल केले आहे की, हे इंटेलिजन्स फेल्युअर होते. अशा संवेदनशील घटनेवर सरकारने खुलासा करावा. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी सर्वच पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता. मग आता आम्ही उत्तर मागितल्यावर शांतता का?” असा सवाल करण्यात आला आहे.
आजपर्यंत अशी कारवाई झाली नाही-नड्डा
यावर सभागृह नेते आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूरवर चर्चा नको असा संदेश सभागृहात जाऊ नये, आम्ही चर्चा करू. मी हे देखील सांगू इच्छितो की देशाच्या स्वातंत्र्यानंतर, आजपर्यंत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूरमध्ये घडलेल्या ऑपरेशनसारखी कारवाई देशात झालेली नाही. ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी सभागृहात सूचना देण्यात आली आहे आणि जो काही वेळ ठरवला जाईल, सरकार त्यावर चर्चा करेल आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल.’
ओब बिर्लांनी फटकारले
लोकसभेत विरोधकांनी नारेबाजी करताच सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना फटकारले. ते म्हणाले, “प्रश्नोत्तर कालावधीनंतर ऑपरेशन सिंदूरवर चर्चा घेतली जाईल. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. मात्र, पहिल्याच दिवशी असा गोंधळ घालणं योग्य नाही. आपल्याला हे वर्तणुकीचे मिथक मोडावे लागेल.”
लोकसभेची कामकाज सल्लागार समिती दुपारी २.३० वाजता बैठक घेईल. विरोधकांनी त्यांना ज्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे ते मांडावे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही, असे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




