मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत महायुतीमध्ये मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. जागावाटपात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाई-आठवले गट) एकही जागा न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “महायुतीने आमचा विश्वासघात केला असून हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशारा देत आठवलेंनी युतीमधील संघर्षाला तोंड फोडले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना महायुतीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये भाजप १३७ आणि शिंदे गट ९० जागांवर लढणार असल्याचे निश्चित झाले, मात्र रिपाईच्या वाट्याला शून्य जागा आल्या. यावर संताप व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले की, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही खंबीरपणे सोबत राहिलो, पण जागावाटपात आम्हाला डावलून आमचा स्वाभिमान दुखावला गेला आहे. विशेष म्हणजे, चर्चेसाठी ठरवलेली वेळही पाळण्यात आली नाही, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे.
रामदास आठवले यांनी आगामी निवडणुकीसाठी रिपाईला किमान १६ जागा मिळाव्यात, अशी मागणी लावून धरली होती. दरम्यानच्या काळात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आठवलेंची भेट घेऊन ‘सन्मानजनक जागा’ देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, प्रत्यक्षात जाहीर झालेल्या यादीत रिपाईचे नाव नसल्याने हे आश्वासन फोल ठरले आहे. या प्रकारामुळे रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला असून, “कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर करू,” असे स्पष्ट केले आहे.
आठवलेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीसमोर मोठे पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. मुंबईतील दलित मतांची मोठी व्होट बँक असलेल्या रिपाईला डावलणे भाजप आणि शिंदे गटाला महागात पडू शकते. आता भाजप आणि शिंदे गट आपल्या कोट्यातून काही जागा रिपाईला देऊन त्यांची मनधरणी करणार की आठवले गट स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




