संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉज मशिनच्या समस्या गंभीर झाल्या असल्याने लाभधारकांना धान्य मिळत नाही. याबाबत ताताडीने उपाययोजना करून धान्य मिळेल आशी व्यवस्था करण्याची मागणी करत आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे याकडे लक्ष वेधले.
विधानसभेत औचित्याच्या मुद्यावर आमदार खताळ यांनी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे निर्माण होत असलेल्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधले. तालुक्यामध्ये 65 हजारांहून अधिक रेशनकार्डधारक असून शासनाच्या अंत्योदय कार्ड आणि प्राधान्य कार्ड या योजनेतून धान्य मिळत असलेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दुकानांत असलेल्या पॉज मशिनच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक गोरगरीब नागरिकांना आपला कामधंदा सोडून दिवसभर स्वस्त धान्य दुकानासमोर ताटकळत उभे राहावे लागत आहे.
त्यामुळे नागरिकांना धान्य न घेता आर्थिक व मानसिक त्रास सहन करत माघारी फिरावे लागण्याची दुर्दैवी वेळ येत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील अनेक नागरीकांना अद्यापही रेशनकार्ड मिळालेले नाही याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने उपाययोजना करून खर्या लाभार्थ्यांना रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली.