अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्वस्त धान्य दुकानामार्फत फेब्रुवारी महिन्यात रेशनवर ज्वारीचे वाटप करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील 3 हजार 288 मेट्रिक टन ज्वारीचे वाटप केले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 8 किलो गहू आणि 8 किलो ज्वारी दिली जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेचे रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती एक किलो गहू आणि एक किलो ज्वारी दिली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यातील बुलढाणा आणि जळगाव हे दोन जिल्हे ज्वारीचे आगार म्हणून ओळखले जात आहेत. या जिल्ह्यातील ज्वारीचा शिल्लक साठा आणि नवीन उत्पादन लक्षात घेता फेब्रुवारी महिन्यात रेशनवर ज्वारीचे वाटप करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. गरीब आणि दुर्बल गटातील लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या तरतुदी करण्यात आली. केंद्र सरकारच्या नवीन एकात्मिक अन्नसुरक्षा योजनेस 1 जानेवारी 2023 पासून सुरू केली. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबाला पुढील पाच वर्षांसाठी (2028 पर्यंत) मोफत धान्य दिले जाणार आहे.
अंत्योदय योजनेतील प्रत्येक शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला 35 किलो धान्य दिले जाते. त्यामध्ये गहू 15 किलो, तर तांदूळ 20 किलो दिला जातो. त्याचबरोबर एक किलो साखर दिली जाते. जिल्ह्यात 87 हजार 950 अंत्योदयचे शिधा पत्रिकाधारक आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक कुटुंबातील सदस्याला पाच किलो धान्य दिले जाते. गहू 2 किलो तर तांदूळ 3 किलो दिले जात आहेत. जिल्ह्यात 6 लाख 24 हजार 535 शिधापत्रिका धारक आहेत.