मुंबई | Mumbai
राज्यातील मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. तसेच काहीही केले तरी चालते, अशी भावना तयार होईल. यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. महायुती सरकारमधील ८ मंत्र्यांना घरी पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर, महायुतीच्या मंत्रिमंडळ बदलात विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता राहुल नार्वेकर यांनी मौन सोडले असून भाष्य केले आहे.
महायुती सरकारच्या आगामी रणनीतीसंदर्भात दिल्लीच्या उच्चपातळीवर बैठकांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं वरिष्ठ सूत्रांकडून स्पष्ट झालं आहे. अशातच दुसरीकडे एका वृत्तपत्राने भाजपात सध्या नाराज असलेले माजी मंत्री, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तर, राहुल नार्वेकर यांना आता कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले. या सगळ्या वृत्तावर राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, माध्यमातील बातम्यांवर मी विशेष लक्ष देत नाही. कारण असा निर्णय माझ्या पक्षाचा आहे. मी अत्यंत संतुष्ट आहे. माझ्या पक्षाने जी जबाबदारी मला दिली आहे, त्यातूनच मी सामान्यातल्या सामान्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील व्यक्तीला न्याय देऊ शकलो. विधानसभा अध्यक्ष म्हणून कामकाजाचा दर्जा उंचावण्याची संधी मला मिळाली. १५२ लक्षवेधी एका अधिवेशनात मांडण्यात आल्या. कामकाज वाढले. मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चर बदलले आहे. तूर्तास आपण मी माझ्या कामावरती संतुष्ट असून जेव्हा केव्हा मंत्रीपदाची माळ पडेल त्यावेळी पाहू. आम्ही पूर्ण डिजिटलाइज केलेले आहे. दोन्ही सभागृह आता पेपरलेस आम्ही करत आहोत. विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले.
दरम्यान, सगळे जण चांगले काम करत आहेत. परंतु, काही लोकांना पक्षाला संधी द्यायची असेल. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो सर्वांनी स्वीकार असेल. विधानसभा अध्यक्षपद हे मंत्र्यांपेक्षा वरचे पद आहे, आनंद कसा होईल? अशी प्रतिक्रिया देत, जी जबाबदारी मला दिली जाईल, ती पार पाडायला तयार आहे. विधानसभा अध्यक्ष असेन, मंत्री असेन किंवा आमदार असेन, जनतेसाठी मला काम करायचे आहे, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




