श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
तीन वर्षापूर्वी मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड सुरू करून सुरुवातीला महिन्याला लाखाला 10 ते 12 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचे काम दोन वर्षापूर्वी गुंडाळण्यात आले असल्याची माहिती असा निधी जमा करणार्या एका लिमिटेड कंपनीच्या संचालकाने दिली. आता संबंधित कंपनी आणि आमचा संबंधच नसल्याचा धक्कादायक खुलासा केल्याने जमा केलेल्या त्या कोट्यवधीचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मांडवगण रोडला तीन वर्षांपूर्वी थाटामाटात तालुक्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेडचे उद्घाटन करण्यात आले.
11 संचालक असणार्या त्या कंपनीत दोन माहिला आणि उर्वरीत पुरुष संचालक होते. या निधी लिमिटेडची भागभांडवल 20 लाख आणि पेड भागभांडवल 10 लाख 77 हजार रुपये दाखवले. याची रतीसर नोंदणीही करण्यात आली. साधारणपणे सभासदाच्या ठेवी गोळा करून कर्ज देणे अशा स्वरूपाचे काम असणार्या या निधी लिमिटेडने कर्ज देण्यापेक्षा ठेवी गोळा करताना महिना 10 टक्के म्हणजे वर्षांला सरासरी 120 टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवले. सुरुवातीला तसा परतावे ही दिला. यामुळे गुंतनवणूकदारांची संख्या हजारोंच्या घरात गेली. 10 ते 20 हजारांपासून काही कोटीच्या घरात गुंतवणूक होत गेली.
मागील तीन महिन्यांपासून मात्र परतावे आणि मुद्दल मिळण्यासाठी गुंतवणुकदारांना वाट पहावी लागत आहे. सुरुवातीचे गुंतवणुकदारांना पैसे मिळत होते. याशिवाय नवीन ग्राहकांच्या गुंतवणूकीवर कमिशन देखील मिळत होते. हे पैसे गोळा करणे दहा टक्केचा परतावा देणे आणि कमिशन देणे यासाठी सुरू केलेली मल्टिपर्पज निधी केवळ नावाला होती. प्रत्यक्षात तेथील व्यवहार मात्र दुसरेच सुरू होते. सर्वात आधी जी मल्टिपर्पज निधी सुरू केली. ती बंद करून त्याच्यातील पैसे दुसर्या एका मल्टीस्टेटमध्ये वर्ग केले. त्या मल्टीस्टेटचेही थाटामाटात उद्घाटन करत आता आमची बँक झाली असे सांगितले.
मात्र, आता त्यातून ही गुंतवणूकदारांचे पैसे नवीन कंपनीमध्ये ग्लोबल ट्रेडिंगसाठी गेले असून सर्वांना पैसे मिळतील असे सांगितले जात आहे. याबाबतीत सर्वात आधी जी मल्टिपर्पज निधी सुरू केली त्याबाबत एक संचालकाला माहिती विचारली असता आम्ही दोन वर्षांपूर्वी निधी बंद करण्यासाठी अर्ज दिले आहेत. आता आम्ही संचालक नाहीत, असे सांगितले. त्यावर अजून तुमचे नावे संचालक म्हणून गुगलवर सर्च केल्यावर येत आहेत, असे विचारल्यावर आम्हाला काही सांगता येतं नाही असे सांगण्यात आले.