Friday, April 25, 2025
Homeनाशिककांदा उत्पादकांना दिलासा : नाशिकसह चार जिल्ह्यात कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश

कांदा उत्पादकांना दिलासा : नाशिकसह चार जिल्ह्यात कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक, अहमदनगरसह छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बॅंक सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत कांद्याचा प्रश्न गाजला होता. महायुतीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

कांदा हे नाशवंत पीक आहे. अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात येत असून त्याची सुरूवात अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून होत आहे. याठिकाणी हिंदुस्थान अग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू होत आहे, असे शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

कांद्याचे उत्पादन ज्या भागात जास्त प्रमाणात होते अशा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर येथे विकरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्याची महाबँक तातडीने सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या जागांचा वापर करण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली.

समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांद्याची बँक करण्याचे प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रकल्प असून कांद्याच्या महाबँकेमुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल. कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विक्री करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून प्रकल्प राबविण्यात यावा. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात यावी जेणे करून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून काम होईल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

या बैठकीला पणनमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...