Sunday, June 8, 2025
Homeअग्रलेखनंदुरबार जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

नंदुरबार जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

मागील बाकावर बसणारा एखादा विद्यार्थी परीक्षेत अचानक वर्गात अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होतो, आपली गुणवत्ता सिद्ध करतो. तेव्हा वर्गातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकसुद्धा अवाक् झाल्याशिवाय राहत नाहीत. नंतर त्या विद्यार्थ्याकडे पाहण्याचा व त्याला दुर्लक्षित करण्याचा सर्वांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलतो. ‘मागास जिल्हा’ म्हणून शिक्का मारला गेलेल्या आणि तसे मानल्या गेलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या बाबतीतसुद्धा काहीसे असेच घडले आहे.

- Advertisement -

आदिवासीबहूल आणि दुर्गम तोंडवळा असलेल्या या जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जिल्हा मागास मानला जात असला तरी याच जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींनी जागलेपणा आणि पुढारलेपणाचे दर्शन घडवून लसीकरणात मुंगुसाचा वाटा उचलला आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची पहिली लाट ओसरत असतानाच दुसरी लाट थडकली. पहिल्या लाटेपेक्षा ती जास्त तीव्र व हानीकारक ठरली.

संसर्गाचा वेग जास्त होता. नाशिक विभागात दुसर्‍या लाटेच्या संसर्गाची व्याप्ती कमी-अधिक प्रमाणात जाणवली. आता ही लाट ओसरत आहे. तथापि अलीकडेच ‘डेल्टा प्लस’ विषाणूने संसर्गबाधित आढळल्याने देशात आणि राज्यात तिसर्‍या लाटेची शक्यता बळावली आहे. ‘डेल्टा प्लस’ म्हणजे काय? आधीच्या प्रकारात आणि यात फरक काय? ते शास्त्रज्ञच जाणोत. कोरोनावर मात करण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन आणि लसीकरण हाच हुकूमी पर्याय असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार वारंवार सांगत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारांनी कधी नव्हे ते तज्ज्ञांच्या सल्ल्यांची उशिरा का होईना, पण दखल घेतली. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. 21 जूनला देशाने लसीकरणाचा उच्चांक प्रस्थापित केला. एकाच दिवसात 84 लाखांहून जास्त नागरिकांना लस देण्यात आली. महाराष्ट्रानेदेखील देशात लसीकरणातील अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. एकाच दिवसात साडेपाच लाख लोकांचे लसीकरण करण्याचा उच्चांक राज्याने गेल्याच आठवड्यात गाठला. सुरुवातीपासून गावोगावी आणि नगरे-महानगरांत लसीकरण जोमाने सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या कामी महत्त्वाची भूमिका निभावत आहेत.

खेडी-पाडी, वस्त्या, गावे आणि शहरे कोरोनामुक्त करण्याच्या निर्धाराने लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींनी आपापल्या गावांतील सर्व वयोगटातील ग्रामस्थांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करून नाशिक विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पुढारलेल्या नाशिक, जळगाव, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांना मागे टाकले आहे. चारही जिल्ह्यांत एकाही ग्रामपंचायत क्षेत्रात 100 टक्के लसीकरण होऊ शकलेले नाही.

विभागात जवळपास पाच हजार ग्रामपंचायती आहेत. पैकी 108 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात 60 वर्षांवरील सर्व ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 121 ग्रामपंचायतींमध्ये 45 ते 60 वयोगटांतील सर्व नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यात जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीच पुढे आहेत. एरव्ही इतर सरकारी योजना वा कार्यक्रमांत विभागात आघाडी घेणार्‍या नाशिक वा नगर जिल्ह्यांनादेखील ही किमया साधता आलेली नाही. त्याची कारणे काय असतील? याचा शोध स्थानिक प्रशासन घेईलच.

लोकजागृतीसोबत आरोग्यसेवक, प्रशासनातील सर्व पातळ्यांवरील अधिकारी-सेवकांचे योगदान तसेच ग्रामस्थांच्या प्रतिसादामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील 8 ग्रामपंचायतींनी 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा विक्रम करून दाखवला. लसीकरणात लक्ष पुरवून पुरेसे सहकार्य करणारे त्या-त्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक, आरोग्य केंद्रांचे अधिकारी, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका व स्वयंस्फूर्त स्वयंसेवक या सगळ्यांच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. विभागातील इतर जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींनी जरूर अनुकरण करावे, अशीच ही कामगिरी आहे. 100 टक्के लसीकरण करणार्‍या ग्रामपंचायतींचे अभिनंदन!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज-का-रण : कोण आहेत हो हे सुधाकर बडगुजर..?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - सल्लागार संपादक बडगुजर काही दिवसातच गिरीश महाजन यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दिसतील आणि पुढील चार वर्षात भाजपचे विधानसभेचे उमेदवार झाल्यास...