Sunday, September 22, 2024
Homeनगरमहसूलमंत्री म्हणून माझी पन्नास कामे, तुमचे एकतरी दाखवा!

महसूलमंत्री म्हणून माझी पन्नास कामे, तुमचे एकतरी दाखवा!

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

निळवंडे धरणाच्या प्रश्नावरुन केवळ आमची बदनामी करण्याचा प्रयत्न आमच्या शेजारच्या मित्रांनी केला. पण धरणातून पाणी काढण्याचे पुण्य हे विखे कुटूंबियांनाच मिळाले. स्वत:ला जलनायक म्हणून घेणार्‍यांनीच समन्यायीचे भुत जिल्ह्याच्या मानगुटीवर बसवून खलनायकाची भूमिका बजावली. सात वर्षे महसूलमंत्री राहूनही जिल्ह्याच्या हिताचा एकही निर्णय त्यांना घेता आला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी केलेली पन्नास कामे दाखवतो, तुमचे एक तरी काम दाखवा, असे थेट आव्हान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांना नाव न घेता दिले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ.भास्करराव खर्डे, सतिष ससाणे, मच्छिंद्र थेटे, नंदू राठी, आण्णासाहेब कडू, शांतीनाथ आहेर, गिताताई थेटे, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ना. विखे पाटील म्हणाले, कारखान्याची ही 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कामगारांचे आहे. कारखानदारीने अनेक संक्रमण पाहीले. आव्हानांवर मात केली. परंतू सहकार चळवळ टिकवून ठेवण्याच्या विचाराने आजपर्यंत झालेली यशस्वी वाटचाल ही खर्‍याअर्थाने खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या विचारांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने साखर कारखानदारीला पाठबळ देण्यासाठी मंत्रालय स्थापन केले. कारखान्यांवर लादलेला दहा हजार कोटी रुपयांचा आयकराचा बोजा कायमस्वरुपी माफ केला. या निर्णयाचे संपूर्ण श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमीत शाह यांनाच द्यावे लागेल, असे त्यांनी आवर्जुन नमुद केले. सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारीचा भविष्यकाळ हा उज्वल आहे.

यापुर्वी फक्त राज्याची शिष्टमंडळ दिल्लीमध्ये नेली जात होती, जाणते राजे केंद्रात मंत्री होते. पण त्यानांही काही करता आले नाही. यावर्षी जिल्ह्यातील धरणं भरल्याचे समाधान आहे. जायकवाडी धरण भरल्यामुळे पाणी सोडण्याची वेळ येणार नसली तरी, समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भुत जिल्ह्यावर कायम आहे. जलनायक म्हणवून घेणार्‍यांनीच 2005 साली हा कायदा आणून खलनायकाची भूमिका बजावली. निळवंडे धरणाच्या बाबतीतही राजकीय हेतूने विखेंना बदनाम करण्यात धन्यता मानली. मात्र धरणातून पाणी देणारच हा शब्द मी दिला होता. महायुती सरकारमुळे तो पूर्ण करता आला. आज लाभक्षेत्रातील बंधारे पाण्याने भरले आहेत याचा आनंद शेतकर्‍यांमध्ये दिसतो.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे गोदावरी खोर्‍यात वळविण्यासाठी महायुती सरकारने आता सर्व्हेक्षणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी 62 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे ना. विखे पाटील म्हणाले. अगामी एक दोन वर्षात हे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्‍यात वळवून खासदार साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आपले ध्येय असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरु आहे. शेतीला मोफत वीज देण्याचा निर्णय सरकारने घेतला. शिर्डी विधानसभा मतदार संघात आणि परिसरात शेतकर्‍यांना सौर उर्जेवर चालणारे पंप आपण उपलब्ध करुन देणार आहोत. जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

तिर्थक्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर सृष्टी, अहिल्याबाई होळकरांचे स्मारक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिर्डी, नगर आणि बेलवंडी येथील औद्योगिक वसाहतीसाठी जागेची उपलब्धता, खंडकरी आणि आकारी पडीत शेतकर्‍यांच्या जमीनींचा महत्वपूर्ण निर्णय ही मोठी उपलब्धी महसूल मंत्री म्हणून आपल्याला करता आली. मात्र सात वर्षे मंत्री राहीलेल्यांना जिल्ह्यासाठी काहीही करता आले नाही. मी केलेली पन्नास कामे दाखवतो तुमचे जिल्ह्यासाठी एकतरी काम दाखवा असे आव्हान ना. विखे पाटील यांनी दिले. सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विषय पत्रिकेवर असलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. निळवंडे कालव्यातून पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ना. विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उपस्थित सभासदांनी टाळ्याच्या गजरात मंजूर केला.

शेतकर्‍यांना आणखी 200 रुपये देणार
विखे पाटील साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना जिल्ह्यात सर्वाधिक एकरकमी 3 हजार रुपये प्रतिटन भाव दिला. वार्षिक सभेत दिवाळी निमित्त आणखी 200 रुपये प्रतिटन देणार असल्याची घोषणा ना.विखे पाटील यांनी केली. 10 ऑक्टोबरपर्यंत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्यासोबतच प्रवरा सहकारी बँकेला 50 वर्षे तर विखे कारखान्याला 75 वर्षे झाल्याने दोन्ही संस्थांनी सभासदांना विशेष भेटवस्तू द्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या