Tuesday, September 17, 2024
Homeनगरउद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; तर कॉग्रेसमध्ये…!, काय म्हणाले महसूलमंत्री ना....

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; तर कॉग्रेसमध्ये…!, काय म्हणाले महसूलमंत्री ना. विखे पाटील

आश्वी |वार्ताहर| Ashwi

- Advertisement -

महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागल्याने आघाडीत आता एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे. योजेनमुळे सर्व बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे महसूल दिनानिमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ आणि दाखल्यांचे वितरण मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास कोते, प्रवरा बँकेचे मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब जर्‍हाड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, गुलाबराव सांगळे यांसह सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर असल्याने मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या. केवळ घोषणा नाहीतर अंमलबजावणी सरकारची असून त्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता महसूल पंधरवडा आयोजित केला असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. राज्यात महायुती सरकारने शेतकर्‍यांचे वीजबील माफ केले.

मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता जिल्ह्यात सहा लाख अर्ज दाखल झाले असून संगमनेर तालुक्यात 88 हजार अर्ज दाखल झाले आहेत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेचा लाभ देण्यात येणार असून महायुतीच्या पाठिशी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद निश्चित राहील, असा विश्वास व्यक्त करून फक्त योजना आपल्या महायुती सरकारची आहे, मात्र उड्या महाविकास आघाडीचे नेते मारत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला. सरकार पारदर्शीपणे काम करीत असून भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही. राज्यात चार हजार तलाठ्यांना नियुक्तीपत्र दिले. अहमदनगरमधील 189 उमेदवार आहेत. पण तलाठी पदाच्या भरती प्रकरीयेवरून केवळ महसूल विभागाला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचा आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला.

याचबरोबर तालुक्यात 34 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना 20 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून 84 हजार शेतकर्‍यांना 128 कोटी रुपयांचा विमा मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भंडारदारा धरणातून पाणी सोडण्यात आले असून ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कालवे, तळे भरून देण्याच्या सूचना आपण अधिकार्‍यांना दिल्या आहेत. निळवंडेच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे सरदार त्र्यंबक डेंगळे यांच्या स्माराकासाठी अनेकांकडून तुम्हांला आश्वासने मिळाली. पण मी काम करणारा कार्यकर्ता असल्याने या स्मारकाच्या कामाकरीता पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या