अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्हा परिषदेच्यावतीने राबवण्यात येणारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील मजुरांसाठी वरदान ठरत आहे. चार वर्षात जिल्ह्यात या योजनेतून 34 हजार 576 कामे झालेली आहेत. यात सर्वाधिक 24 हजार 188 कामे घरकुलांची झाली आहेत. यातून ग्रामीण भागातील लाखो मजुरांना रोजगार मिळाला असून यात सर्वाधिक कामे ही अकोले तालुक्यात 4 हजार 498 झालेली आहेत. त्यानंतर 3 हजार 942 कामे नेवासा, 3 हजार 695 कामे पाथर्डी, तर 3 हजार 251 कामे कर्जत तालुक्यात झालेली आहेत.
रोजगार हमी योजनेंतर्गत काम मागणार्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये किमान 100 दिवसांपर्यत रोजगाराची हमी सरकारकडून मिळते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याचे योजनेचे उद्दिष्ट आहे. रोहयोतून मुख्यत्वे ग्रामपंचायत, तालुका कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, तसेच रेशीम संचालनालय विभागामार्फत कामे केली जातात.
यात ग्रामपंचायतीमार्फत घरकूल, गुरांचा गोठा, शेळी शेड, पोल्ट्री शेड, शौचालय, शोषखड्डा, विहिर, रस्ता दुतर्फा लागवड, रस्ते, शाळा संरक्षक भिंत ही कामे प्रामुख्याने घेतली जातात. तालुका कृषी विभागामार्फत फळबाग, शेततळे, नाडेप, व्हर्मी कंपोस्ट, शेत बांधावरील वृक्ष लागवड ही कामे प्रामुख्याने घेतली जातात. सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोपवाटिका, रस्ता दुतर्फा लागवड ही कामे घेतली जातात. तसेच रेशीम संचालनालय विभागामार्फत तुती लागवडीचे काम हाती घेण्यात येते. रोजगावर हमीवर दिवसेंदिवस मजुरांची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या रोहयोवर 15 हजार मजूर काम करत असून ही संख्या गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी संख्या आहे.
चार वर्षात अशी झाली कामे
घरकूल 24 हजार 188, गुरांचा गोठा 33 हजार 57, शेळी शेड 327, पोल्ट्री शेड 29, शोषखड्डा 1 हजार 956, शौचालय 585, विहीर 344, रस्ता 115, शाळा संरक्षक भिंत 28, विहीर पुनर्भरण 189, शेततळे 341, नाडेप 272, फळबाग 2 हजार 440, बांधावरील वृक्ष लागवड 186, रस्ता दुतर्फा लागवड 149, रोपवाटिका 32, तुती लागवड 38. एकूण – 34 हजार 576.
मजूर संख्याही सर्वाधिक
सध्या जिल्ह्यात रोजगार हमीवर गेल्या तीन वर्षांतील सर्वात जास्त म्हणजे 15 हजार मजूरसंख्या आहे. वाढलेली मजुरी, यंदा राबविण्यात येत असलेली शासन आपल्या दारी योजना, जलयुक्त शिवार योजनेतील शोषखड्डे यामुळे गेल्या तीन वर्षांत रोहयोवरील मजुरांच्या संख्येने 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.