अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घेण्यात येणार्या सर्व प्रकाराच्या रस्त्यांची कामे नागपूरचे रोजगार हमी विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानूसार बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, नवीन कामे बंद करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरात झालेल्या रस्त्यासह अन्य विकास कामांची मजूरी आणि देयक या पोटी 46 लाख 8 लाखांचा निधी थकला आहे.
याबाबत नाशिकच्या एका महिला आमदार यांनी विधानमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने विधानमंडळाला सादर करण्यात आली आहे. या माहितीमध्ये नगरसह राज्यातील रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावण्यात आल्याचे उत्तर देण्यात आले आहे. मागील वर्षी रोजगार हमी विभागाच्यावतीने मंजुरी दिलेल्या बजेटमध्ये सर्वाधिक कामे ही पानंद रस्त्याची करण्यात आली. अन्य कामांना संधी असतांना त्याऐवजी पानंद रस्त्याची कामे करण्यात आल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी चालूवर्षी राज्यात सर्व प्रकारच्या रस्त्यांची कामे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. रोहयोमध्ये अकुशल आणि कुशल स्वरूपात कामे करण्यात येतात. त्यासाठी कुशल आणि अकुशलची टक्केवारी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्यात रोहयोच्या अकुशल कामात यंत्रणाचा अधिक वापर झाल्याचे समोर आले आहे.
रोहयोतील अन्य विकास कामे अपूर्ण ठेवण्यात येवून पानंद रस्त्यांच्या कामे करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यावर रोहयो विभागाचे नागपूरचे आयुक्त यांनी 5 डिसेंबर 2024 राज्यातील रस्त्याची कामे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी विधानमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने उत्तर देण्यात आले असून यात रोहयोतून रस्त्याची कामे बंद करण्यात आली असल्याचे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात रोहयावर काम करणार्या 39 हजार 136 मजूरांचे 28 कोटींची मजुरी आणि अन्य विकास कामांची देयके असे 46 कोटी 8 लाखांच्या निधी देणे बाकी असून हा याबाबतचा निधी रखडला आहे. रोहयोतील मजूरांच्या मजूरीची शंभर टक्के रक्कम ही राज्य सरकार तर कुशल कामाच्या देयकांपैकी 75 टक्के केंद्र सरकार व 25 टक्के राज्य सरकार अदा करत असते.