Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : उथळ पाण्याला खळखळाट फार...

राऊंड द विकेट : उथळ पाण्याला खळखळाट फार…

डॉ. अरुण स्वादी

म्हणतात ना, मउथळ पाण्याला खळखळाट फारफ! …हार्दिक पांड्याचे तसे झाले आहे. काहीही स्टेटमेंट देतो. मैदानावरदेखील असा वागतो की, वाटावे विनोद कांबळी परतला आहे. ते गुजरात टायटन्सचे ठीक आहे हो, पण आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना उगाच मगफची बाधा झाल्यासारखे बोलणे बरे नाही. मग तुमचे मगर्वाचे घर खालीफ होते. त्या निकोलस पूरणला इंस्टाग्रामवर त्याने ललकारले काय; मग निकोलसने त्याला पहिल्याच षटकात दोन उत्तुंग षटकार मारले काय. सगळेच हास्यास्पद…! किमान कॅप्टनसाठी तरी …आधीच्या सामन्यातही तिलक वर्माला अर्धशतक पूर्ण करू न देता स्वतः सिक्सर मारून सामना संपवायचा हा तर बालिशपणा होता.

- Advertisement -

नव्या खेळाडूसमोर तो काय आदर्श ठेवत असेल? मुळात सात फलंदाज आणि चार निव्वळ गोलंदाज घेऊन वीस ओवरची मॅच खेळायची हा डावपेच चुकीचा आहे. त्यात फलंदाजीत हे गोलंदाज तुकडी मफफमधले मढफ विद्यार्थी असतील तर प्रश्नच मिटला आणि या डावपेचाची तो भलावण करतोय ? त्यातच पहिल्या सात फलंदाजामधला एक नुकताच बढती मिळालेला अष्टपैलू खेळाडू असेल तर दुसरे काय होणार? इंग्लंड बझ क्रिकेट खेळते. कारण त्यांचा नवव्या क्रमांकाचा वूड, रशीद किंवा जॉर्डन सिक्सर मारून मॅच जिंकून देतो. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया अगदी वेस्ट इंडिजकडेसुद्धा असे लाँग हॅण्डल वापरणारे तळाचे फलंदाज आहेत, पण आमच्याकडे लज्जारक्षणासाठीदेखील असे वस्त्र नाही. त्यातल्या त्यात कुलदीप यादव बरा, पण त्याने कवर्सवरून षटकार मारलाय? अर्षदीप सिंगने एक षटकार खेचला, पण तो वाटतो फलंदाज? अगदी हरभजनएवढा तरी वाटतो? तो यजवेंद्र चाहल तर मला गोपा वाटतो.

पाळण्यात सोबतीला ठेवतात तसे याला दहा बरोबर अकरावा ठेवतात. यांच्याकडून ओडियन स्मिथसारखा छक्का काय अपेक्षित धरणार? मुकेश कुमार बॅट वापरण्यासाठी घेऊन येतो, असे कोणी म्हणाले होते. त्याने कड तरी वापरली. या सर्वांनी मिळून शेवटच्या दोन ओवरमध्ये सहा धावा तरी काढल्या असत्या? या सामन्यात नसलेले बिष्णोई, आवेश खान हे देखील त्याच माळेचे मणी आहेत. बुमराह तरी एखादा अपवाद सोडल्यास वेगळे काय करतो? सिराजची कथा वेगळी नाही. आणि हार्दिक म्हणतो महम मसातफ काफी हैफ। या लांबच लांब शेपटामुळे वरच्या फलंदाजांना मनमोकळे खेळता येत नाही. त्यात वाईट म्हणजे फलंदाजी येणारे गोलंदाज आमच्याकडे कोणी नाहीतच.

एक शार्दुल ठाकूर आणि फिरकीत जडेजा व आश्विन त्याला अपवाद. ही सीरिज हरल्याचे दुःख नाही, पण अष्टपैलू खेळाडूंची ही वानवा फार खटकते. कितीही आयपीएल खेळा, आमच्या आजाराला उतारा सापडत नाही. तरी बरे, कप्तान पांड्या बॉलिंग करायला लागला आहे. नाही तर आपले काही खरे नाही, पण अक्षर पटेल फलंदाजीच्या नादात गोलंदाजी विसरतो आहे की काय, असे वाटायला लागले आहे. स्वतः पांड्या भास मारायच्या नादात मोठे फटके मारायला विसरला आहे. कदाचित त्याच्या खेळाचा अभ्यास करून गोलंदाज त्याला हाफ वॉली आता फारसे देत नसावेत.पोलार्डला असेच गप्प केले गेले होते. काय अवस्था झाली आहे आमच्या फिनिशरची?

प्रयोगाच्या नावावर दुय्यम संघ पाठवून आणि मार खाऊन आम्ही स्वतःची नाचक्की करत आहोत, असे कोणालाच वाटत नाही का? नव्याना संधी द्यायलाच पाहिजे, पण सगळे संघ नवीन उतरवायची गरज आहे का? मागे लंकेत आम्ही हेच केले आणि त्यांच्या मृतप्राय संघात प्राण ओतला. इथे मृत्यू शय्येवरच्या वेस्ट इंडिज संघाला कृत्रिम श्वास देऊन पुन्हा जीवित करण्यात आले आहे. आता आयर्लंडला नवसंजीवनी द्यायचे पवित्र कार्य पुनरागमन करणार्‍या जसप्रीत बुमराहला करायचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या